Friday, December 8, 2017

ग्रामीण भागातील ग्राहकांच्या जनजागृतीवर भर द्यावा -अरुण देशपांडे



 पुणेदि.8:- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राज्य शासन आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने  15 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत 'ग्राहक जनजागृती पंधरवडा' साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवडयात  जिल्हयातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांच्या जनजागृतीवर भर द्यावा,  अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिल्या.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील शासकीय व अशासकीय सदस्यांसोबत ग्राहक संरक्षण विषयासंबंधीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये श्री.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी  उपस्थित संबंधितांना त्यांनी ही सूचना केली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. पी. शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक नितीन उदमले तसेच शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. 
दरवर्षी 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. ग्राहकांना त्यांचे हक्क व कर्तव्य यांची माहिती सर्वसामान्यांना करुन देण्यासाठी या पंधरवडयामध्ये  विविध विभागांनी ग्राहक जागृतीपर स्टॉल लावण्याबरोबरच नवनविन उपक्रम राबवावेत. या उपक्रमात स्थानिक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, ग्राहक पंचायत यांचा सहभाग घ्यावा. जेणेकरुन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत ग्राहक संरक्षण कायदयाची माहिती पोहोचून ग्राहक सुजाण होईल.  तसेच ग्राहक जनजागृतीपर घडीपत्रिका, पत्रके वाटप करणे, पथनाटय, भारुड, ग्राहक दिंडीच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्काची माहिती देण्यात यावी. या सर्व कार्यक्रमांचा अहवाल राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीला पाठविण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्राचीन आणि अधुनिक विज्ञानाची सांगड घालून शास्त्रज्ञांनी समन्वयाचा पूल उभारावा - राज्यपाल चे . विद्यासागर राव


राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या 87 व्या वार्षिक सत्राचे थाटात उद्घाटन
पुणे दि.8 : राष्ट्रीय विज्ञान अकादमी ही भारतातील अनेक वर्षांची उज्ज्वल परंपरा असणारी सर्वात मोठी विज्ञान संस्था आहे, देशातील विज्ञानाला लोकप्रिय करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी या संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. लोकांच्या जीवनातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी संशोधन करण्याबरोबरच अधुनिक विज्ञान आणि पारंपारिक भारतीय विज्ञान यांच्यात सांगड घालून समन्वयाचा पूल निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या शास्त्रज्ञांनी करण्याचे अवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले.
येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चंद्रशेखर सभागृहात राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या (एनएएसआय) 87 व्या वार्षिक सत्रानिमित्त बेसिक रिसर्च:इटस् रोल अन नेशन डेव्हलपमेंट या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक सत्राचे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, इस्त्रोचे चेअरमन डॉ. किरण कुमार, पद्मविभूषण डॉ. मंजू शर्मा, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा. दिलीप ढवळे, एनएसआयच्या सचिव डॉ. वीणा टंडन आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, भारतीय विज्ञानाला मोठी परंपरा आहे. एकेकाळी भारतीय विज्ञान सर्वात अग्रेसर होते. मात्र परदेशी वर्चस्वामुळे भारतीय विज्ञानाला झाकोळून टाकले आहे. प्राध्यापक एम.जे.के. मेनन, प्राध्यापक एम.एस. स्वामीनाथन आणि आता डॉ. अनिल काकोडकर यासारख्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय विज्ञान अकादमीने भरीव काम केले आहे. त्यामुळे भारत विज्ञान क्षेत्रातील आपले पूर्वीचे अव्वल स्थान पुन्हा प्राप्त करेल. विज्ञानाच्या मदतीनेच भारत गरिबी, उपासमार, अज्ञान, रोगराई, स्वच्छता, कुपोषण, पाणी आणि ऊर्जा सुरक्षा यासारख्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. गेल्या काही दशकांत भारताने माहिती तंत्रज्ञान, स्पेस सायन्स, न्यूक्लियर सायन्स, फार्मास्युटिकल्स, मेडिसीन आणि इतर क्षेत्रात क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे.
देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याचे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, गणित आणि‍ विज्ञानाकडे विद्यार्थ्यांचा ओढा निर्माण व्हावा यासाठी शालेयस्तरापासून विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्याच बरोबर शालेय स्तरापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत अधिक चांगले विज्ञान शिक्षक तयार करण्याची आवश्यकता आहे. मुलांना विज्ञान विषय अधिक रंजक प्रकारे शिकविण्यासाठी विज्ञानाच्या शिक्षकांना प्रशिक्षीत करण्याची आवश्यकता आहे. विज्ञान क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्थांनी यासाठी विशेष प्रयत्न करून शिक्षण संस्था आणि सामान्य जनता यांच्याबरोबर चांगला संवाद सुरु करावा. शिक्षण संस्था आणि संशोधन संस्थांना केंद्रस्थानी ठेवून आपण काम करण्याची आवश्यकता आहे. अनेक देशात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विज्ञान महोत्सव सुरू असतात, त्याच धर्तीवर आपल्या राज्यात विज्ञान संस्था आणि प्रत्येक विद्यापीठांच्या विज्ञान विभागात दरवर्षी विज्ञान महोत्सवाचे आयोजन करावे. 
            डिजीटल क्रांतीमुळे देशात माध्यमांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी माध्यमांनीही आपले योगदान द्यावे. त्यासाठी विविध विज्ञान विषयक कार्यक्रमांना माध्यमांनी प्रसिध्दी द्यावी. गेल्या काही दिवसात भारत सरकारने संशोधन आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय, धोरणात्मक निर्णय घेवून काम सुरु केले आहे. नाविन्याला आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने स्टार्टअप इंडिया कार्यक्रम सुरू केला आहे. यामुळे देशात चांगले वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
            डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, भारत हा वेगाने विकसीत होणारा देश आहे. देशाच्या विकासाच्या या प्रक्रीयेत विज्ञानाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सामान्य लोकांच्या जीवनात अधिक सुखकर परिवर्तन होण्यासाठी विज्ञान संस्था प्रयत्नशील असतात. अशा संस्थांना आणि वैज्ञानिकांना प्रोत्साहन, मार्गदशर्न करण्याचे करण्याचे काम राष्ट्रीय विज्ञान अकादमी करत आहे. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी हा परिसंवाद उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या डॉ. अनिल कुमार, देबाशीष चटोपाध्याय, इन्साद अली खान या शास्त्रज्ञांचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या वार्षिकीचे प्रकाशन करण्यात आले.
            यावेळी दलीप ढवळे, मंजू शर्मा, किरण कुमार यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन करमळकर यांनी केले. तर आभार डॉ. वीणा टंडन यांनी मानले. या कार्यक्रमाला देशातील विविध राज्यातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******

















  

Saturday, December 2, 2017

शिलालेखामुळे हत्तरसंग कुडलला राष्ट्रीय स्तरावर ओळख : सहकारमंत्री



सोलापूर दि.2 :- श्री. संगमेश्वर मंदिरात असलेल्या मराठी भाषेतील शिलालेखामुळे हत्तरसंग कुडल गावाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडल येथील प्राचीन शिलालेख आणि मंदिर समूहाबाबत आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या सत्रात श्री. देशमुख बोलत होते. हत्तरसंग कुडल येथे आज झालेल्या या चर्चासत्राचे आयोजन राज्य शासनाच्या पुरातत्वशास्त्र विभाग, सोलापूर विद्यापीठ आणि लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. ए.एन.मालदार, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ.गो.ब.देगलूरकर, परातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, प्रा.डॉ. अभिजीत दांडेकर, सहाय्यक संचालक विलास वहाणे, डॉ.माया पाटील, संगमेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष षडाक्षरी बिराजदार, सरपंच मधुकर बिराजदार आदी उपस्थित होते.
सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, ‘सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भारतीय संस्कृतीच्या खुणा असलेली मंदिरे आहेत. ही मंदिरे शिल्प यांचे संवर्धन करण्याचा आणि लोकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हत्तरसंग कुडल येथील शिलालेखाबाबत आज होणारे चर्चासत्र याबाबतीत अतिशय महत्वाचे आहे.’
सोलापूर जिल्ह्यात धार्मिक स्थळे आहेत. जिल्ह्याला संत आणि वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे एका सर्किटमध्ये जोडली तर धार्मिक पर्यटनाचा विकास होईल आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, मात्र त्यासाठी आपण दृष्टीकोनात बदल करण्याबरोबरच नव नवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत, असे श्री. देशमुख म्हणाले.
डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘भारतीय संस्कृती प्राचीन आहे. मंदिर आणि मूर्ती आपल्या संस्कृतीमध्ये मुख्य वैशिष्ट्य आहे. संस्कृती संरक्षीत ठेवण्यासाठी मंदिर आणि मूर्तीकलांचा अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. यासाठी पुरातत्वशास्त्र अतिशय महत्वाचे आहे.
यावेळी डॉ. मालदार यांचेही भाषण झाले. डॉ. माया पाटील आणि डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. ज्ञानेश्वरी हजारे यांनी आभार मानले.
तत्पुर्वी, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चर्चासत्रासाठी आलेल्या संशोधकासमवेत मंदिर समूह आणि शिलालेखाची पाहणी केली.