पुणे दि. 9 (वि.मा.का.): पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षाच्या कालावधीत देशात केलेल्या नाविन्यपूर्ण कामांचा
आढावा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि
प्रशासकीय दृष्टीकोनातून ‘इनोव्हेशन रिपब्लिक: गव्हर्नन्स इनोव्हेशन्स
इन इंडीया अंडर नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या माध्यमातून मांडला
आहे. सुशासनासाठी विविध सोप्या व अभिनव कल्पना सादर करून
करण्यात आलेल्या कामांचा संशोधनात्क तपशील या पुस्तकात घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे
केले.
येथील ‘यशदा’च्या लेझीम सभागृहात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार डॉ.
विनय सहस्त्रबुद्धे आणि धीरज अय्यर यांनी लिहीलेल्या ‘इनोव्हेशन रिपब्लिक:
गव्हर्नन्स इनोव्हेशन्स इन इंडीया अंडर नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे
प्रकाशन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार होते,
मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते या कार्यक्रमाला येवू शकले नाहीत.
त्यामुळे मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
त्यानंतर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्हिडीओ
कॉन्फरंन्सिंगव्दारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी यशदाचे
महासंचालक डॉ. आनंद लिमये, यशदाच्या उपमहासंचालिका
प्रेरणा देशभ्रतार, धीरज अय्यर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे चेअरमन
अनिरुद्ध देशपांडे, महासंचालक रवींद्र साठे उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव
म्हणाले, या पुस्तकात केंद्र शासनाकडून सन 2014 ते 2018 या कालावधीत
शासनस्तरावर राबविलेल्या 17 नवनवीन कल्पनांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या 100
विभागांच्या उपक्रमांद्वारे आणि 17 क्षेत्रांतील नवकल्पनांवर हे पुस्तक आधारित
आहे. भूतकाळाचा तपशील पाहिल्यास भारत अनेक वर्षांपासून इनोव्हेशन रिपब्लिक होता.
मात्र परकीय शक्तींच्या अधिपत्यामुळे देशाची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक नुकसान झाले.
गत चार वर्षांच्या कालखंडात, नरेंद्र मोदी सरकारने शासनाच्या विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी केली आहे.
या काळात देशात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात
मोठे बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि गतीमान
कारभार करण्यावर या सरकारचा भर राहिला आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या
माध्यमातून सामान्य जनतेचे जगणे अधिक सुखकर होण्यासाठी या शासनाने मोलाची भूमीका बाजवली
असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या चार वर्षात भारताच्या राजनैतिक आणि परदेशी
संबंधांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल झाला असल्याचे निरीक्षण नोंदवत राज्यपाल म्हणाले, भारताने अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया
आणि आफ्रिकन देशांशी धोरणात्मक भागीदारी बनविली आहे. इस्राईलच्या पंतप्रधानांच्या
ऐतिहासिक दौऱ्यामुळे दोन राष्ट्रांमधील मजबूत भागीदारीसाठी नवीन मार्ग उघडण्यात
आला आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे म्हणाले, केंद्र शासनाने गेल्या चार
वर्षात लोकसहभागावर भर दिल्यामुळे शासनाच्या प्रक्रीयेत सामान्य नागरिकांना सामावून
घेण्यात आले आहे. त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी होत आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून प्रशासनातील सकारात्मक बदल संशोधनात्मक पातळीवर
टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमंत पांड्ये यांनी केले. तर आभार अजय सावरीकर यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध
क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
*****