Tuesday, February 19, 2019

महायोजना शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना निश्चित फायदा होईल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






महायोजना शिबिराचे उद्घाटन

पुणे,दि.19 -एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी महायोजनासारखी शिबिरे उपयुक्त ठरतील,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.                   
 कोथरूड येथील महेश विद्यालय येथे महायोजना शिबीर 2019 चे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते .  
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, ,खासदार अनिल शिरोळे, . प्रा. मेधाताई कुलकर्णी आदी उपस्थित होते.
   ग्रामीण भागामध्ये योजनांची शिबिरे आयोजित केली जातात.  शहरी भागांमध्ये अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्य नागरिकाना लाभ देण्यासाठी मेधाताईंनी कोथरूड भागामध्ये या शिबिराचे आयोजन केले आणि या शिबिराला एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय,ही आनंदाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस पुढे  म्हणाले, प्रत्येकाला आवश्यक असलेल्या योजनांचा स्टॉल याठिकाणी आहे. समाजातील सर्व घटकांकरिता योजना आहेत. सर्व स्टॉलवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, यावरूनच लोकांना या शिबिराची आवश्यकता होती, मात्र  व्यवस्था नव्हती . आज या शिबिरामुळे ती व्यवस्था उभी राहिली आहे. लाखो लोकांचे कल्याण त्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे शासनाचे नियोजन आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाच्या घरात पोहोचला, तर आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा मिळाल्या आहेत. पुणे शहरात मोठ्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. प्रकल्प मार्गी लावून त्या प्रकल्पाला निधी देण्याचे  काम शासनाने केले आहे. येत्या तीन ते चार वर्षात पुणे शहर सर्वोत्तम शहर असेल. पुण्याचा बदललेला चेहरा येत्या काळात नक्कीच पाहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
   महायोजना शिबिराच्या माध्यमातून ज्या लाभार्थींनी योजनांसाठी अर्ज केला असेल त्यासाठी आलेल्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आपल्या बरोबर राहील,असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना . मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. महायोजना शिबिराच्या माध्यमातून विविध योजना एकाच छाताखाली आणण्याचा प्रयत्न असून या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
     महायोजना स्थळी नवीन मतदार नाव नोंदणी,  प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, संजय गांधी श्रावण बाळ योजना, राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजना,  नोकरदार महिला वस्तीगृह योजना,   उज्वला योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना आदी योजनाबाबत माहिती लाभासाठी  स्टॉल लावण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या वतीने महिला बाल कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना, युवा कल्याणकारी योजना, दिनदयाळ अंत्योदय  योजना  या योजनांसंदर्भात सविस्तर माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. योजनांची माहिती लाभाची नोंदणी प्रक्रिया जाणून घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायोजना शिबिरातील स्टॉलची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
                                            ०००००

बांधकाम कामगारांना हक्काचे घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा : अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा शुभारंभ













पुणे दि. 19-  राज्यातील 25 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करुन सर्वांना 2022 पर्यंत हक्काचे घर देणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अटल बांधकाम कामगार आवास.योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
            येथील शेती महाविद्यालयातच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय पाटील, आमदार बाळा भेगडे, बाबूराव पाचर्णे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, पिंपरी चिंचवड चे महापौर राहुल जाधव, बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार मीना, रेराचे अध्यक्ष गौतमकुमार चटर्जी आदी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बांधकाम कामगार देश आणि राज्य निर्माण करण्यात आघाडीवर आहेत. मात्र या कामगारांची आजपर्यंत दखल घेतली गेली नाही. आमचे सरकार बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असेल.
            अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या माध्यमातून कामगारांना  हक्काचे घर देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. राज्य शासन पंचवीस लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करणार असून पाच वर्षात सर्वांना घरे देण्यासाठी कटीबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
            कामगारांच्या हितासाठी राज्यात साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम कामगारांच्या घरांसाठी निधीची कमी पडू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
             कामगारांना मध्यान्ह भोजन, आरोग्य आणि प्रशिक्षण देण्याच्या योजना आखण्यात आली आहे.बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
            कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या मनोगतात कामगारांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रधान सचिव राजेशकुमार मिना यांनी प्रास्ताविक केले. कामगार आयुक्त राजीव जाधव.यांनी आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले.


अडीच लाखाची शिष्यवृत्ती मिळाल्याने पी एच डी झालो
        कामगारांच्या मुलाला संशोधनासाठी अडीच लाखाची शिष्यवृत्ती उपलब्ध करुन दिल्यामुळे मी पी.एच.डी करु शकलो. वंचित व गरीब मुलांसाठी अनेक योजना आहेत. कोणत्याही घटकातील मुलगा उच्च शिक्षण घेऊ शकतो, मात्र त्यासाठी शासनाचे पाठबळ हवे असते. मला शिष्यवृत्ती मिळाली नसती तर मी संशोधन करु शकलो नसतो असे सोलापूरच्या अनिल झेंडेने यावेळी सांगितले.
            कामगार विभागाने माझ्या गुणवत्तेची कदर करुन मला शिष्यवृत्ती दिली, त्याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली.


*****