Wednesday, January 31, 2018

दुर्जनांवर मात करण्यासाठी सज्जनांनी संघटीत व्हावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



पुणे दि. 31: समाजातील सज्जन शक्ती संघटीत झाल्यासच दुर्जन शक्तींवर सहज मात करता येते आणि सकारात्मक बदल घडतो. म्हणून सज्जन शक्तींनी संघटीत व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथ केले.
            येथील गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात अनुलोम लोकराज्य अभियान (अनुलोम) पुणे विभगाच्यावतीने आयोजित सारथ्य समाजाचे विकास मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अनुलोमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे, सारंगधर निर्मल, हर्षल मोर्डे, मयुर राजे उपस्थित होते.
            श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकशाहीच्या यंत्रणेला चालविण्यासाठी समाजातील लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असतो. लोकसहभागाशिवाय कोणतेही काम होवू शकत नाही. समाजातील सकारात्मक शक्ती जेंव्हा सक्रीय होते, त्यावेळी समाजात वेगाने परिवर्तन घडत असते. समाजातील सुप्त सकारात्मक शक्तीला सक्रीय करण्याचे काम अनुलोम ही संस्था करत आहे. ही संस्था पूर्णपणे अराजकीय असल्याने समाजासह शासकीय यंत्रणेलाही ही संस्था जवळची वाटते. समाजात चांगल्या विचाराने समाजाच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या अनेक समाजसेवी संस्था आहेत. या सर्व संस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम अनुलोम संस्था करत आहे. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात वेगवान पद्धतीने काम करणारी ही संस्था आहे. अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत 20 लाख सामान्य लोकांना जोडून 7 लाख कार्यकर्ते निर्माण करणारी ही संस्था आहे. सामाजिक कार्यकर्ते हेच अनुलोम संस्थेचे शक्तीस्थान आहे.
            कोणतेही लोकोपयोगी काम करताना शासनाचा आणि शासकीय अधिकाऱ्यांचा भाव हा सेवेचा असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत श्री. फडणवीस पुढे म्हणाले, जेंव्हा शासकीय अधिकारी सामान्य लोकांना जवळची वाटू लागतात, त्याचवेळी समाजाच्या विकासाला आणि परिवर्तनाला सुरूवात होते. सर्व शासकीय योजनांचा आत्मा हा लोकसहभाग हाच आहे. वेगवेगळ्या चौदा शासकीय योजना व विविध विभागांना एकत्र करून जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. लोकसहभागासह सामाजिक संस्था व व्यक्तींच्या सकारात्मक सहभागामुळे आज महाराष्ट्र दुष्काळमुक्तीकडे दमदार वाटचाल करत आहे. शास्त्रीय दृष्टीकोन समोर ठेवून शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविले. त्यासाठी जलमित्र ही संकल्पना राबविण्यात आली. या जलमित्रांनी राज्यात जलक्रांती करून दाखवली आहे. सकारात्मकतेचे हे आपल्या समोरील सर्वात मोठे उदाहरहण आहे.
            समाजात परिवर्तन करण्याची शक्ती संघटनेत आहे. त्यामुळे देशासाठी, समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांनी संघटीत होवून काम करण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसात शासनाच्या पुढाकाराने उद्योग क्षेत्रातील सामाजिक दायित्व फंडाच्या माध्यमातून मोठे काम राज्यात उभे राहिले आहे. कोणतेही सकारात्मक काम हे राष्ट्रीय कामच आहे. त्यामुळे समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांनी एकत्रित येवून काम करण्याचे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.
            यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, समाजकल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन, पीएमआरडीएचे संचालक किरण गित्ते, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोड यांना अनुलोम सन्मित्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
            या मेळाव्याच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्था, संघटना, युवक मंडळे, महिला बचत गट यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यासाठी सुमारे दोन हजाराच्या वर  संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुलोमचे पुणे विभाग प्रमुख अनिल मोहिते यांनी केले. तर आभार रविंद्र दहाड यांनी मानले.
***





































Monday, January 22, 2018

“झिरो पेन्डन्सी” चा शासननिर्णय लवकरच निर्गमीत - मनूकुमार श्रीवास्तव


पुणे दि. 22 : शासन यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यासाठी झिरो पेन्डन्सीहे प्रभावी साधन ठरणार आहे. हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून पुणे विभागात याची चांगली अंमलबजावणी झाली आहे. राज्यातील सर्व विभागांत हा उपक्रम राबविण्यासाठी शासनस्तरावर प्रक्रीया सुरू असून लवकरच झिरो पेन्डन्सीचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी दिली.    
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, सांगलीचे जिल्हाधिकारी व्हि. एन. कळम-पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह पुणे विभागातील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   
श्री. मनूकुमार श्रीवास्तव म्हणाले, झिरो पेन्डन्सी हा उपक्रम अत्यंत प्रभावी आहे. या उपक्रमामुळे शासकीय कार्यालयात कामाचे वातावरण तयार होते. मात्र या उपक्रमांच्या अंमलबजावणीत सातत्य राहण्याची आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालाला प्रत्येक वर्षी त्यांच्याकडील असणाऱ्या जबाबदारीतील पेन्डन्सीचा अहवाल जोडणे अनिवार्य करून त्यावर त्यांच्या कामांचे मुल्यांकन करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. याबाबतचा उल्लेख झिरो पेन्डन्सीच्या नव्या शासन निर्णयात नमूद करण्यात येईल.
तसेच शासनाने प्रत्येक जिल्ह्यांना नेमून दिलेले महसूलाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यात अनाधिकृत गौण खनिजांच्या उत्खननावर जोरदार कारवाई करण्याच्या सूचना श्रीवास्तव यांनी दिल्या. तसेच शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्याच्या सूचना ही त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पुणे विभागातील सर्व कामांचा आढावा दिला. तसेच झिरो पेन्डन्सीच्या अंमलबजावणीच्या माहितीचे सादरीकरण त्यांनी यावेळी केले.
बैठकीनंतर श्री. मनूकुमार श्रीवास्तव यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाची पहाणी केली. तसेच झिरो पेन्डन्सी अंतर्गत राबविण्यात आलेल्या अभिलेख कक्षांची पहाणी केली. नूतन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच झिरो पेन्डन्सीच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

*****









Wednesday, January 17, 2018

पंचायत राज व्यवस्थेच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी






§  विभागीय परिषदेचे शानदार उद्घाटन.
§  परिषदेत मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
§  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 300 प्रतिनिधींची उपस्थिती.
पुणे दि. 17 : पंचायत राज व्यवस्थेच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. 73 व्या घटनादुरूस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशैलीत अनेक महत्वाचे बदल झाले आहेत. या घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित विभागीय कार्यशाळा ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणासह स्थानिक स्वराज्य संस्थांची पुढील दिशा ठरविण्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज व्यक्त केले. 
73 व्या घटना दुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)च्या संवाद सभागृहात राज्य निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगती व पुढील दिशा या विषयावर विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घान प्रसंगी श्री. दळवी बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शमिका महाडीक, ग्रामीण विकास विभागाचे माजी सचिव सुधीर ठाकरे, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव अविनाश सणस, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार उपस्थित होते.
श्री. चंद्रकांत दळवी म्हणाले, राज्य स्थापनेनंतर लगेचच महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली. 73 व्या घटनादुरूस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना अनेक अधिकार दिले. राज्य निवडणूक आयोग ही याच घटनादुरूस्तीची देण आहे. या घटनादुरूस्तीमुळेच ग्रामसभांना घटनात्मक दर्जा दिला. ग्रामीण भागातील जीवन सुखकर होण्यासाठी पंचायत राज व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. या रौप्य महोत्सवा निमित्त आयोजित विभागीय परिषदांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रगती आणि पुढील दिशा निश्चित होण्यास मदत होणार आहे.



श्री. विश्वासराव देवकाते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था या ग्रामीण विकासाच्या पाया आहेत. ही पंचायत राज्य व्यवस्था बळकट असेल तरच देशाचा विकास होणार आहे. 73 व्या घटनादुरूस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना अनेक अधिकार दिले आहेत. या घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित  विभागीय परिषदेचा उपयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्तीकरणासाठी होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी केले. या कार्यशाळेला विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, विभागातून स्थानिक स्वराज्य संस्थांचे सुमारे 300 प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
*****






पारदर्शकतेबरोबरच कामांची गती वाढविण्यावर भर द्या -विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी


पुणे दि. 12: ग्रामपातळीवर निधी अभावी प्रलंबीत असणाऱ्या कामांशी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची योग्य सांगड घालून अशी सर्व कामे तातडीने मार्गी लावावीत. कोणतेही शासकीय काम करताना पारदर्शकतेला महत्व आहेच, मात्र त्याबरोबरच अशा कामांची गती वाढविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज दिल्या.
            येथील उपायुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुड गव्हर्नन्स इनिशीएटिव्ह विभागस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त (रोहियो) जयंत पिंपळगावकर, उपसचिव (रोहियो) प्रमोद शिंदे, विनयकुमार आवटे, गुड गव्हर्नन्स इनिशीएटिव्ह श्रुती सिंग, अनिलकुमार कट्टा, सिटीझन इनफॉरमेशन बोर्डचे चिराग धुम, सुचरिता थोरात उपस्थित होते.
            चंद्रकांत दळवी म्हणाले, या विभागीय स्तरावरील गुड गव्हर्नन्सच्या कार्यशाळेच्याधर्तीवर तालुकास्तरापर्यंत कार्यशाळा व्हाव्यात, या माध्यमातून ग्रामपातळीवरील शासनाच्या सेवकांना याचे ट्रेनिंग मिळावे. ग्रामपातळीवर अनेक कामे आहेत, या कामासाठी निधी हवा आहे. मनरेगामध्ये निधीची कोणतीही कमतरता नाही. अशा कामांना मनरेगाच्या कामांत अंतर्भुत करावे, त्यामुळे ही कामे मार्गी लागतील. मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामे कशी करता येतील यावर भर द्यावा. मनरेगाच्या कामांचे पुढील वर्षीचे नियोजन करताना त्यामध्ये काय नावीन्यपूर्ण करता येईल याची चर्चा करावी. मनरेगाचा फायदा विभागातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहाचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
            या कार्यशाळेत प्रमोद शिंदे, श्रुती सिंग, अनिलकुमार कट्टा, सुचरिता थोरात, श्री  काकडे, संदीप कोहिनकर, शैलेश सुर्यवंशी, चिराग धुम, संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत पिंपळगावकर यांनी केले. सूत्र संचालन विनयकुमार आवटे यांनी केले. तर आभार सुचरिता थोरात यांनी मानले. या कार्यशाळेला पुणे विभागातील मनरेगाचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगाचे गट विकास अधिकारी उपस्थित होते.
*****


Friday, December 8, 2017

ग्रामीण भागातील ग्राहकांच्या जनजागृतीवर भर द्यावा -अरुण देशपांडे



 पुणेदि.8:- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राज्य शासन आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने  15 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत 'ग्राहक जनजागृती पंधरवडा' साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवडयात  जिल्हयातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांच्या जनजागृतीवर भर द्यावा,  अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिल्या.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील शासकीय व अशासकीय सदस्यांसोबत ग्राहक संरक्षण विषयासंबंधीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये श्री.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी  उपस्थित संबंधितांना त्यांनी ही सूचना केली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. पी. शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक नितीन उदमले तसेच शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. 
दरवर्षी 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. ग्राहकांना त्यांचे हक्क व कर्तव्य यांची माहिती सर्वसामान्यांना करुन देण्यासाठी या पंधरवडयामध्ये  विविध विभागांनी ग्राहक जागृतीपर स्टॉल लावण्याबरोबरच नवनविन उपक्रम राबवावेत. या उपक्रमात स्थानिक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, ग्राहक पंचायत यांचा सहभाग घ्यावा. जेणेकरुन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत ग्राहक संरक्षण कायदयाची माहिती पोहोचून ग्राहक सुजाण होईल.  तसेच ग्राहक जनजागृतीपर घडीपत्रिका, पत्रके वाटप करणे, पथनाटय, भारुड, ग्राहक दिंडीच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्काची माहिती देण्यात यावी. या सर्व कार्यक्रमांचा अहवाल राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीला पाठविण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्राचीन आणि अधुनिक विज्ञानाची सांगड घालून शास्त्रज्ञांनी समन्वयाचा पूल उभारावा - राज्यपाल चे . विद्यासागर राव


राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या 87 व्या वार्षिक सत्राचे थाटात उद्घाटन
पुणे दि.8 : राष्ट्रीय विज्ञान अकादमी ही भारतातील अनेक वर्षांची उज्ज्वल परंपरा असणारी सर्वात मोठी विज्ञान संस्था आहे, देशातील विज्ञानाला लोकप्रिय करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी या संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. लोकांच्या जीवनातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी संशोधन करण्याबरोबरच अधुनिक विज्ञान आणि पारंपारिक भारतीय विज्ञान यांच्यात सांगड घालून समन्वयाचा पूल निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या शास्त्रज्ञांनी करण्याचे अवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले.
येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चंद्रशेखर सभागृहात राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या (एनएएसआय) 87 व्या वार्षिक सत्रानिमित्त बेसिक रिसर्च:इटस् रोल अन नेशन डेव्हलपमेंट या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक सत्राचे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, इस्त्रोचे चेअरमन डॉ. किरण कुमार, पद्मविभूषण डॉ. मंजू शर्मा, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा. दिलीप ढवळे, एनएसआयच्या सचिव डॉ. वीणा टंडन आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, भारतीय विज्ञानाला मोठी परंपरा आहे. एकेकाळी भारतीय विज्ञान सर्वात अग्रेसर होते. मात्र परदेशी वर्चस्वामुळे भारतीय विज्ञानाला झाकोळून टाकले आहे. प्राध्यापक एम.जे.के. मेनन, प्राध्यापक एम.एस. स्वामीनाथन आणि आता डॉ. अनिल काकोडकर यासारख्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय विज्ञान अकादमीने भरीव काम केले आहे. त्यामुळे भारत विज्ञान क्षेत्रातील आपले पूर्वीचे अव्वल स्थान पुन्हा प्राप्त करेल. विज्ञानाच्या मदतीनेच भारत गरिबी, उपासमार, अज्ञान, रोगराई, स्वच्छता, कुपोषण, पाणी आणि ऊर्जा सुरक्षा यासारख्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. गेल्या काही दशकांत भारताने माहिती तंत्रज्ञान, स्पेस सायन्स, न्यूक्लियर सायन्स, फार्मास्युटिकल्स, मेडिसीन आणि इतर क्षेत्रात क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे.
देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याचे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, गणित आणि‍ विज्ञानाकडे विद्यार्थ्यांचा ओढा निर्माण व्हावा यासाठी शालेयस्तरापासून विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्याच बरोबर शालेय स्तरापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत अधिक चांगले विज्ञान शिक्षक तयार करण्याची आवश्यकता आहे. मुलांना विज्ञान विषय अधिक रंजक प्रकारे शिकविण्यासाठी विज्ञानाच्या शिक्षकांना प्रशिक्षीत करण्याची आवश्यकता आहे. विज्ञान क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्थांनी यासाठी विशेष प्रयत्न करून शिक्षण संस्था आणि सामान्य जनता यांच्याबरोबर चांगला संवाद सुरु करावा. शिक्षण संस्था आणि संशोधन संस्थांना केंद्रस्थानी ठेवून आपण काम करण्याची आवश्यकता आहे. अनेक देशात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विज्ञान महोत्सव सुरू असतात, त्याच धर्तीवर आपल्या राज्यात विज्ञान संस्था आणि प्रत्येक विद्यापीठांच्या विज्ञान विभागात दरवर्षी विज्ञान महोत्सवाचे आयोजन करावे. 
            डिजीटल क्रांतीमुळे देशात माध्यमांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी माध्यमांनीही आपले योगदान द्यावे. त्यासाठी विविध विज्ञान विषयक कार्यक्रमांना माध्यमांनी प्रसिध्दी द्यावी. गेल्या काही दिवसात भारत सरकारने संशोधन आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय, धोरणात्मक निर्णय घेवून काम सुरु केले आहे. नाविन्याला आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने स्टार्टअप इंडिया कार्यक्रम सुरू केला आहे. यामुळे देशात चांगले वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
            डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, भारत हा वेगाने विकसीत होणारा देश आहे. देशाच्या विकासाच्या या प्रक्रीयेत विज्ञानाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सामान्य लोकांच्या जीवनात अधिक सुखकर परिवर्तन होण्यासाठी विज्ञान संस्था प्रयत्नशील असतात. अशा संस्थांना आणि वैज्ञानिकांना प्रोत्साहन, मार्गदशर्न करण्याचे करण्याचे काम राष्ट्रीय विज्ञान अकादमी करत आहे. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी हा परिसंवाद उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या डॉ. अनिल कुमार, देबाशीष चटोपाध्याय, इन्साद अली खान या शास्त्रज्ञांचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या वार्षिकीचे प्रकाशन करण्यात आले.
            यावेळी दलीप ढवळे, मंजू शर्मा, किरण कुमार यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन करमळकर यांनी केले. तर आभार डॉ. वीणा टंडन यांनी मानले. या कार्यक्रमाला देशातील विविध राज्यातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******

















  

Saturday, December 2, 2017

शिलालेखामुळे हत्तरसंग कुडलला राष्ट्रीय स्तरावर ओळख : सहकारमंत्री



सोलापूर दि.2 :- श्री. संगमेश्वर मंदिरात असलेल्या मराठी भाषेतील शिलालेखामुळे हत्तरसंग कुडल गावाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडल येथील प्राचीन शिलालेख आणि मंदिर समूहाबाबत आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या सत्रात श्री. देशमुख बोलत होते. हत्तरसंग कुडल येथे आज झालेल्या या चर्चासत्राचे आयोजन राज्य शासनाच्या पुरातत्वशास्त्र विभाग, सोलापूर विद्यापीठ आणि लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. ए.एन.मालदार, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ.गो.ब.देगलूरकर, परातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, प्रा.डॉ. अभिजीत दांडेकर, सहाय्यक संचालक विलास वहाणे, डॉ.माया पाटील, संगमेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष षडाक्षरी बिराजदार, सरपंच मधुकर बिराजदार आदी उपस्थित होते.
सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, ‘सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भारतीय संस्कृतीच्या खुणा असलेली मंदिरे आहेत. ही मंदिरे शिल्प यांचे संवर्धन करण्याचा आणि लोकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हत्तरसंग कुडल येथील शिलालेखाबाबत आज होणारे चर्चासत्र याबाबतीत अतिशय महत्वाचे आहे.’
सोलापूर जिल्ह्यात धार्मिक स्थळे आहेत. जिल्ह्याला संत आणि वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे एका सर्किटमध्ये जोडली तर धार्मिक पर्यटनाचा विकास होईल आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, मात्र त्यासाठी आपण दृष्टीकोनात बदल करण्याबरोबरच नव नवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत, असे श्री. देशमुख म्हणाले.
डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘भारतीय संस्कृती प्राचीन आहे. मंदिर आणि मूर्ती आपल्या संस्कृतीमध्ये मुख्य वैशिष्ट्य आहे. संस्कृती संरक्षीत ठेवण्यासाठी मंदिर आणि मूर्तीकलांचा अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. यासाठी पुरातत्वशास्त्र अतिशय महत्वाचे आहे.
यावेळी डॉ. मालदार यांचेही भाषण झाले. डॉ. माया पाटील आणि डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. ज्ञानेश्वरी हजारे यांनी आभार मानले.
तत्पुर्वी, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चर्चासत्रासाठी आलेल्या संशोधकासमवेत मंदिर समूह आणि शिलालेखाची पाहणी केली.