“सीआयआयआय” प्रकल्प उद्योजकांसह विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त –
-
डॉ. राजेंद्र
जगदाळे
पुणे दि. 15 : सातत्याने होणाऱ्या तंत्रज्ञानातील संशोधनामुळे सध्याच्या शिक्षण प्रणालीतून बाहेर पडणारे अभियंते उद्योगक्षेत्राला आवश्यक असणारी गरज भागवू शकत नाहीत. सेंटर फॉर इन्व्हेनशन, इनोव्हेशन अँड इनक्युबेशन (सीआयआयआय) प्रकल्प उद्योजकांसह विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन सायन्स अँड टेक्नॉलॉली पार्क (एसटीपी)चे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी आज केले.
कर्वेनगर येथील मराठवाडा मित्रमंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी पार्क आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्यात “सेंटर फॉर इन्व्हेनशन, इनोव्हेशन अँड इनक्युबेशन” (सीआयआयआय) या प्रकल्पाच्या उभारणीसाठी त्रिसदस्यीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. राजेंद्र जगदाळे बोलत होते.
यावेळी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या एपीएसी सेल्स अँड ग्लोबल मार्केटिंग अँड कम्युनिकेशचे अध्यक्ष आनंद भदे, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव
गणगे, डॉ. राजेंद्र जगदाळे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. माधवराव सुर्यवंशी, मानद सचिव किशोर मुंगळे, भाऊसाहेब जाधव, एस. एम. देशपांडे उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क ही संस्था केंद्र सरकार आणि पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत आहे. प्रयोगशाळेत तयार होणारे नवतंत्रज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी ही संस्था दुवा म्हणून काम करते. अभियांत्रिकीबरोबरच आता बायोटेक्नॉलॉजी, कृषी, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात ही संस्था काम करणार आहे. नवकल्पनांना आणि नवउद्योजकांना प्रेरणा देण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. या संस्थेसह टाटा टेक्नॉलॉजी आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेला सेंटर फॉर इन्व्हेनशन, इनोव्हेशन अँड इनक्युबेशन (सीआयआयआय) हा प्रकल्प नव अभियंत्यांसाठी उपयुक्त आहे.
श्री शिवाजीराव गणगे म्हणाले, मराठवाडा मित्र मंडळाचे “येथे बहुतांचे हित” हे ब्रीद आहे. त्यामुळे समाजातील सर्वसामान्य विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण मिळावे आणि उद्योग जगताची परिपूर्ण अभियंत्यांची गरज भागावी यासाठी हा “सीआयआयआय” हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.
श्री आनंद भदे म्हणाले, चांगल्या अभियांत्यांची निर्मिती करणे हे या प्रकल्पामागचे खरे उद्दीष्ट आहे. रोजच्या रोज तंत्रज्ञानात बदल होत आहेत, या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना अभियांत्यांना खूप अवघड जाते. ग्राहकांच्या समस्या सोडविणारे तंत्रज्ञान निर्मिती हाच यामागचा उद्देश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिपूर्ण अभियांत्यांची निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी टाटा टेक्नॉलॉजी, सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी पार्क आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्यात “सेंटर फॉर इन्व्हेनशन, इनोव्हेशन अँड इनक्युबेशन” (सीआयआयआय) या प्रकल्पाच्या उभारणीसाठी त्रिसदस्यीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कागदपत्रांचे अदान-प्रदान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी श्याम देशपांडे, मराठावाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री. सोनावणे, टाटा टेक्नॉलॉजीचे पुष्काराज कोनगुल, विक्रम सराफ, के. आर. पाटील, डॉ. शाळीग्राम, श्री. नंदनवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रदीप तामखडे यांनी केले. तर आभार एस. एम. देशपांडे यांनी मानले.
00000