Thursday, February 27, 2020

बोलीभाषा हेच मराठी भाषेचे सौंदर्य - माहिती उपसंचालक मोहन राठोड




पुणे, दि.२७: बोलीभाषा हे मराठी भाषेचे सौंदर्य असून त्यातूनच मराठी भाषा समृध्द झाली आहे. मराठीला अधिक समृध्द बनविण्यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे, असे मत माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी व्यक्त केले.
            मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय व मॉडर्न महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, मॉडर्न महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अमृता ओक, प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. युगंधर शिंदे, मॉडर्न महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रा.डॉ.वैजयंतीमाला जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रोटरी वॉटर ऑलिम्पियाड मधील प्रथम पारितोषिक विजेता स्वप्नील पवार व अन्य विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून कीर्तनाचे निरुपण, कविता, आईसाठीचे पत्र वाचन असे विविध कलागुण सादर केले.
श्री.राठोड म्हणाले, मराठी ही अडीच हजार वर्षांपुर्वीची भाषा आहे. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मराठी भाषेचा गोडवा अन्य भाषेत नाही. दैनंदिन व्यवहारात आवश्यक ठिकाणी इंग्रजी व हिंदी भाषेचा वापर करायला हवा, मात्र इंग्रजीचे ज्ञान घेताना मराठी भाषेकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये.
डॉ.अमृता ओक म्हणाल्या, व्यक्तीच्या विचारांचा प्रभाव भाषेवर तर भाषेचा प्रभाव आपल्या विचारांवर आणि संस्कृतीवर पडत असतो. आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्या मातृभाषेतून संवाद व लेखनकलेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.
डॉ. युगंधर शिंदे म्हणाले, प्रमाणभाषा ही व्यवहारासाठी उपयुक्त असून माणसांना माणसांशी जोडण्याचं काम बोलीभाषा करते, म्हणून बोलीभाषेचा देखील वापर करायला हवा. मराठी भाषा केवळ महाराष्ट्रात बोलली जात नाही, तर बाहेरील राज्यात देखील बोलली जाते. मराठी माध्यमाच्या शाळा अन्य राज्यात देखील सुरु आहेत, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
राजेंद्र सरग म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.वैजयंतीमाला जाधव यांनी केले. सूत्रसंचालन जान्हवी पुरंदरे व ऋतुजा चिंचपुरे या विद्यार्थिनींनी केले तर प्रा.डॉ.पवार यांनी आभार मानले.

Friday, February 14, 2020

केंद्र सरकारच्या योजना गतीने राबवा - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर



  पुणे,दि.१४: केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन या योजना गतीने राबवा, अशा सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती चे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांनी केल्या.
             जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार अमर साबळे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            श्री. जावडेकर यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले,  वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो ची मदत होणार असून मेट्रोच्या कामांसाठी केंद्र सरकार आवश्यक निधी पुरवेल, तथापि ही कामे जलदगतीने पूर्ण करावीत. जिल्ह्यात माध्यान्ह भोजनाची योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून मुलांच्या वजन व उंचीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे, हे या योजनेला मिळालेले यश आहे.  प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आवश्यक आहे. कचरा व्यवस्थापनासंबंधी सविस्तर आराखडा तयार करावा, असे सांगून घनकचरा व्यवस्थापन व कचऱ्याच्या वर्गीकरणावर भर द्या, असे श्री. जावडेकर म्हणाले.
            मुळा-मुठा नदी स्वच्छ व प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे, असे सांगून ते म्हणाले, मुळा-मुठा संवर्धनासाठी संबधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येतील. हिंजवडी, वाघोली सह पुण्यात गजबजलेल्या बऱ्याच भागात वाहतूक समस्या भेडसावत असून ही समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. येत्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा करुन मार्ग काढू, असेही श्री. जावडेकर म्हणाले.
            खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्ह्यातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी बैठका घेऊन समन्वयातून लवकरात लवकर प्रश्न सोडवायला हवेत, असे सांगितले. प्रधानमंत्री मुद्रा योजना, मेट्रोच्या कामाची सद्यस्थिती, माध्यान्ह भोजन, अंगणवाडी पूरक पोषण आहार, शहर व लगतच्या भागातील कचरा व्यवस्थापन, रेल्वे स्टेशन वरील वाय-फाय सुविधा, आयुष्यमान भारत योजना, समग्र शिक्षा योजना आदी विषयांवर चर्चा झाली.


Thursday, February 13, 2020

राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण - राष्ट्रपती राम नाथ कोविंद


 पुणे दि. 13: देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज केले.
          लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्यपत्नी सविता कोविंदराज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नौसेना अध्यक्ष एडमिरल करमबीर सिंह उपस्थित होते.
         राष्ट्रपती कोविंद म्हणालेदेशाची सागरी अर्थव्यवस्था  लोकांच्या हिताशी  जोडली जात आहे. बहुतांश व्यापार समुद्र मार्गाने केला जात आहेकेवळ राष्ट्रीय सुरक्षाच नव्हे तर  देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या विस्तृत प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. नौदल हे आपल्या समुद्री सामर्थ्याचे प्रमुख साधन आहेसमुद्री सीमांचे संरक्षण करण्यासाठी तसेच व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यासाठी आणि नागरी आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यात नौदलाच्या धाडशी कार्याचा  देशाला अभिमान आहे. भविष्यातही नौदलाच्या माध्यमातून निश्चितच गौरवास्पद कामगिरी घडेल, असा विश्वास श्री. कोविंद यांनी व्यक्‍त केला.
          यावेळी आयएनएस शिवाजी प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर,  विद्यार्थी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, February 12, 2020

जनतेचा विश्‍वास अबाधित ठेवण्‍यासाठी बँकांनी कायम प्रयत्‍नशील राहणे गरजेचे -राष्ट्रपती राम नाथ कोविंद

एनआयबीएम’चा सुवर्णमहोत्सवी सोहळा थाटात संपन्न
           
 पुणे दि. 12: देशाच्या आर्थिक व्यवस्थेत बँकांचे महत्त्व लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा लागू करण्यात आला. सार्वजनिक पैशाचे संरक्षक म्हणून बँकांची महत्‍त्‍वाची जबाबदारी आहे. जनतेचा बँकेवर असलेला विश्‍वास अबाधित ठेवण्‍यासाठी बँकांनी कायम प्रयत्‍नशील राहणे गरजेचे आहेअसे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज केले.
          राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेचा एनआयबीएम’ सुवर्णमहोत्सवी सोहळा राष्ट्रपती कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडलात्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्यपत्नी सविता कोविंदराज्यपाल भगतसिं कोश्यारी, परिवहन तथा संसदीय कार्यमंत्री ॲड अनिल परब, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दासनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेन्टचे संचालक डॉ. के. एल. धिंग्रा उपस्थित होते.
         राष्ट्रपती कोविंद म्हणालेबँका या आमच्या आर्थिक व्यवस्थेच्या भरभराटीचे निदर्शक आहेत. बँकांनी आपल्या कार्यक्षमतेमुळे लोकांचा विश्वास आणि आदर मिळविला आहे. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये बँकांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्याच्या वेळीबँकिंग क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. परंतु त्यानंतरच्या कालावधीत बँकिंग क्षेत्राने केलेली प्रगती समाधानकारक आहेदेशातील बहुतांश खेड्यांमध्ये बँकांच्या शाखा आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियामक निरीक्षणानेही बँकिंग कार्यात अधिक स्थिरता आणली आहे. नियामक म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडियाची भूमिका व्यापक करण्यात आली आहे. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल आणि आमच्या आर्थिक प्रणाली अधिक विश्वासार्ह बनतीलअसा विश्वास श्री. कोविंद यांनी व्यक्‍त केला.
          राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणालेक्षमता वाढीसाठी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेची एनआयबीएम’ स्थापना ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँकांच्या दूरदृष्टीचे द्योतक होती. बँक व्यवस्थापनात संशोधनप्रशिक्षणशिक्षण आणि सल्ला यासाठी स्वायत्त शिखर संस्था म्हणून संस्थेची स्थापना करण्यात आलीसंस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक बँकर्स प्रशिक्षित आहेत. एनआयबीएममध्ये चांगल्या संशोधन सुविधा आहेत. या सुविधांचा उपयोग गरीब घटकांसाठी आर्थिक उत्पादने तयार करण्यासाठी केला जाणे आवश्यक आहे. देशाची प्रगती गरिबांच्या सामूहिक आर्थिक सामर्थ्याच्या योगदानावर अवलंबून असल्याचे श्री. कोविंद यांनी सांगितले.
           ‘­दिव्यांग’ व्यक्तींशी झालेल्या संवादातून त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता दिसून आल्याचे सांगून राष्ट्रपती कोविंद म्हणालेदिव्यांग व्यक्तींना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिव्यांग’ व्यक्तींना बँकिंग सुविधांमध्ये सहज प्रवेश मिळण्यासाठी विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांना आर्थिक सेवांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व उपाययोजना कृतीशीलतेने कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एनआयबीएम संस्थेच्या कार्याची माहिती असलेल्या पुस्तिकेचे, टपाल तिकीटाचे प्रकाशन तसेच बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
           यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी  आर्थिक क्षेत्रात राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेचे महत्त्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेचे एनआयबीएम’ संचालक डॉ. के. एल. धिंग्रा यांनी केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकरजिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ . के. वेंकटेशम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरगव्हर्निंग बोर्डचे सदस्यविद्यार्थीप्राध्यापक आणि इतर कर्मचारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                           0000

Friday, February 7, 2020

ताण-तणावाच्या निराकरणासाठी खेळ आवश्यक - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर



पुणे दि.७: दैनंदिन जीवनातील ताण-तणावाच्या निराकरणासाठी खेळ आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

   केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे दिनांक ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान 'अखिल भारतीय नागरी सेवा टेबल टेनिस स्पर्धा' आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास दिल्ली बोर्डाचे रवींद्र देव  तसेच महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष राजीव बोडस, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तथा जिमखाना सचिवालयाचे सभापती राजेंद्र पवार तसेच उपसभापती अनंत सावंत उपस्थित होते.

  स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देऊन डॉ. म्हैसेकर म्हणाले, निरोगी जीवनासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण  खेळाची आवड अंगीकारायला हवी. प्रत्येक व्यक्ती तंदुरुस्त राहिल्यास कार्यालयीन कामकाजात देखील सकारात्मक बदल होऊ शकतात, असे ते म्हणाले.

 स्पर्धेचे आयोजन मुंबई जिमखाना सचिवालयाच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिमखाना सचिवालयाचे मानद महासचिव तथा स्पर्धा सचिव अनंत शेट्ये, सहसचिव संजय कदम, सतीश सोनवणे, मकरंद गयावळ तसेच सचिवालयाचे अन्य सदस्य  प्रयत्नशील आहेत. स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यांमधील ३७ टेबल टेनिस संघाचे बालेवाडीत आगमन झाले असून सुमारे ४५० स्पर्धक स्पर्धेत सहभागी होत आहेत. सहभागी खेळाडूंची निवास व्यवस्था बालेवाडी येथे करण्यात आली असून  मुख्य पंच म्हणून मधु लोणारे काम पाहत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, January 16, 2020

शेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

                                कृषिक 2020" प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

 पुणे दि. 16: शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपारिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.  राज्यातील शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. 
         शारदानगर (माळेगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित "कृषिक 2020" प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवारउपमुख्यमंत्री अजित पवारकृषिमंत्री दादाजी भुसेपशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदारकृषी राज्यमंत्री विश्वजीत कदमखासदार सुप्रिया सुळेआमदार रोहित पवारधीरज देशमुखइस्राईलचे आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते सल्लागार दूत डॅन अलुफसिने अभिनेते अमीर खानजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरेपंचायत समितीच्या सभापती नीता बारवकरबारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरेॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवारडॉ सुहास जोशी उपस्थित होते. 

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना पुढे म्हणालेकृषिक प्रदर्शन हे प्रात्यक्षिकासह असणारे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अभिमान वाटावे असे काम झाले आहे. माळरानावर नंदनवन फुलले आहे. जग झपाट्याने बदलत असून विविध क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपला देश हा शेती प्रधान असून शेती हाच आपला मुख्य कणा आहे. देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक नैसर्गिक संसाधनांवर ताण आला आहे. सर्वजण पोटात अन्न जावे म्हणूनच काम करत असतात. या सर्वांना जगविण्याचे काम शेतकरी करतो. 

             मानव कोणतीही गोष्ट तयार करु शकतोमात्र पाणी निर्माण करू शकत नाही असे सांगत मुख्यमंत्री श्रीठाकरे म्हणाले,भविष्याचा विचार करून  आपल्याला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. हे नियोजन झाल्यास शेती समृद्ध होईल. आता माती विना शेती आणि हवे वरील शेतीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्याच प्रमाणे व्हर्टिकल शेतीचेही प्रयोग सुरु आहेत. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक चमत्कार होत असतातशेतीच्या नवनवीन प्रयोगांचेही चमत्कार याच भूमीत होतील. महाराष्ट्राचा शेतकरी देशातील शेतकऱ्यांना नक्की  दिशा दाखवेलअसा विश्वास व्यक्त करत शेतीसाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

           यावेळी  खासदार शरद पवार म्हणाले, "कृषिक"च्या माध्यमातून दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. जगाची शेती बदलत आहे. त्यामुळे उत्पादकता वाढत आहे. या क्षेत्रात सातत्याने सुधारणाबदल आणि  संशोधन करणे आवश्यक आहे. देशात उपयुक्त संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहीत करण्याची भूमीका राज्य शासन नक्की घेईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
           

  कृषी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तेथील विविध शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांच्याशी संवाद साधला.
         ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचाली विषयीची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. सुहास जोशी आणि डॉ. मई नाऊ यांनी "दुष्काळ निवारण कृती आराखडा" या विषयावरील शास्त्रीय संकल्पनेचे सादरीकरण केले. यावेळी डॅन अलुफ यांचे भाषण झाले. सिनेअभिनेते आमीर खान यांच्याशी यावेळी संवाद साधण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र पवार यांनी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचालीची माहिती दिली.
            या कार्यक्रमाला देशभरातील कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञतंत्रज्ञविविध विद्यापीठांचे कुलगुरूविद्यार्थी प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



Friday, January 10, 2020


रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक
भूसंपादनाच्या कामांना प्राधान्य द्या
           -आशिष शर्मा
पुणे दि. 9: पुणे विभागातील राष्ट्रीय राजमार्गासह महामार्गाच्या कामांना गती येण्यासाठी जमिनीच्या भूसंपादनाची कामे प्राध्यान्याने करावीत, यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महसूल विभागाच्या भूसंपादन शाखेने समन्वयाने काम करण्याच्या सूचना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वित्तीय संचालक आशिष शर्मा यांनी केल्या.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन बैठक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक (वित्तीय) आशिष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, "एनएचएआय"चे राजीव सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  
श्री आशिष शर्मा म्हणाले, पुणे विभागातील राष्ट्रीय राजमार्गांची कामे सुरु आहेत. मात्र काही ठिकाणी कामे रखडली आहेत. ज्या ठिकाणी कामे रखडली आहेत, त्या ठिकाणी भूसंपादनाचे विषय प्रलंबित असतील तर ते तातडीने सोडविण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झाली आहे, मात्र त्या ठिकाणी काही अडथळे येत असतील तर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करावे. अशा कोणत्या आणि किती ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे, त्याचा आकृतीबंद तयार करून तो एनएचएआयने महसूल विभागाला सादर करावा. राष्ट्रीय राजमार्गाची प्रस्तावीत कामे पूर्ण करण्यासाठी नेमकी किती जमिन आवश्यक आहे, त्याची यादी करण्याची सूचना त्यांनी केली.
तसेच पुणे-सातारा महामार्गाचे कामही रखडलेले असून या मार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर आणि परिसरात वाहनकोंडीचा सामना प्रवशांना वारंवार करावा लागतो. या टोलनाक्यावर वाहनांच्या टोल आकारणीचे योग्य नियोजन नसल्यामुळेच या समस्या उद्भवत असाव्यात, या प्रकणी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचना श्री शर्मा यांनी केल्या. या रस्त्याच्या कामाला गती देण्यासह वाहनधारकांच्यात फास्ट टॅग विषयी जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
चांदणी चौकाच्या कामाला प्राधान्य- विभागीय आयुक्त
चांदणी चौक उड्डाणपूलासाठी आवश्यक असलेल्या 37 मिळकतीचे 2.94 हेक्टर  क्षेत्राच्या भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी पुणे महानगरपालिकेकडे पाठविले आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी 30 टक्के रक्कम पुणे महानगरपालिकेने जमा केल्यानंतर या कामाला प्राधान्य देत भूमी अभिलेखच्या जिल्हा अधिक्षकांनी कालमर्यादेत करून देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. या कामासाठी एनडीएची काही जागा संपादीत करणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांच्याकडून भरपाई म्हणून 16 कोटींसह त्यांच्या कमानीच्या पुनर्रबांधणीची त्यांची मागणी आहे. या बाबतही संरक्षण विभागाशी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून याबाबतही तातडीने तोडगा काढण्यात येत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. 
या बैठकीत खेड-सिन्नर, संत तुकाराम पालखीमार्ग, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, पुणे विभागातील सांगली व सोलापूर जिल्ह्यातून जाणारा रत्नागिरी-नागपूर महामार्ग या रस्त्यांच्या कामाचा व त्यासाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला सातारा, सांगली, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील भूसंपादन अधिकारी तसेच एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.
*****