पुणे दि. 9 : स्वच्छता ही जनसेवा आहे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा
आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून निर्मलवारीचे महत्व राज्यभर पोहोचले असून याच
माध्यमातून राज्यात स्वच्छता अभियान अधिक गतीमान करणार असल्याचे प्रतिपादन पाणी
पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.
येथील विधानभवन परिसरात ग्रामविकास विभाग, पाणी
पुरवठा व स्वच्छता विभागयांच्यावतीने आयोजित स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा
शुभारंभ श्री. बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी
ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल
किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज
मांढरे, पाणी पुरवठा संचालक डॉ. सतीश उमरीकर, उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेकर उपस्थित होते.
श्री. बबनराव लोणीकर म्हणाले, पंढरपूरच्या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो
वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांना शासनाच्यावतीने सर्व सुविधा पुरविण्यात येतात. पंढरपूरच्या वारीत शेतकरी, कष्टकरी जनता सहभागी होत
असते. वर्षभरात एक कोटीहून अधिक भाविक भेट देत असतात. पंढरपूर स्वच्छ राहण्याच्या
दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये 25 हजार शौचालये
उभारण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षात प्रबोधनाच्या माध्यमातून पंढरपूरची वारी
निर्मल झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. विश्वासराव देवकाते-पाटील म्हणाले, पंढरपूरच्या वारीच्या कालावधीत पालखी मार्गावर जिल्हा
परिषदेच्या माध्यमातून वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पालखी
मार्गावर मोठ्या वाहनांना जाता येत नाही, त्यासाठी पालखी
मार्गावर टू व्हिलर आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, स्वच्छता दिंडीत राज्यभरातील 17 जिल्ह्यांचे चित्ररथ सहभागी झाले आहेत. चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी “नमामि” चंद्रभागा अभियान शासनाच्यावतीने सुरू करण्यात
आले आहे. चार टप्प्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे भाषण
झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यभरातून आलेल्या निवडक कलापथकांचे सादरीकरण
करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीत सहभागी
झालेल्या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
No comments:
Post a Comment