Friday, September 9, 2016

जलयुक्त हे लोकसहभागाचे यश - जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल


सातारा, दि. 9 (जिमाका) :  शासनाच्या प्रत्येक योजनेचे यश हे लोकसहभागावर अवलंबून असते. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून  जिल्ह्यात झालेली जलक्रांती हे याच लोकसहभागाचे यश आहे. त्यामुळे शासनाच्या प्रत्येक योजनेमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने येथील कूपर कॉलनी सांस्कृतिक मंडळात संवादपर्व -2016 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, नगरसेविका सुवर्णा पाटील, पत्रकार सुजीत आंबेकर, अध्यक्ष सूर्यकांत देशमुख, उपाध्यक्ष मुकुंद मोघे, मोरया ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष यशवंत चव्हाण, उपाध्यक्ष उदय पवार, विठ्ठल जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा माहिती कार्यालय निर्मित जलयुक्त शिवार अभियान माहिती पट प्रदर्शित करण्यात आला. संवादपर्व -2016 या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती गणेशोत्सव काळात जनतेपर्यंत पोहचविण्यात येत  असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल पुढे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याचा दृष्य परिणाम आता दिसून येत आहे. भूजलपातळीत पाण्याची वाढ होऊन कोरड्या विहिरींना, विंधन विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ झाली आहे.  यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनातही मोठा बदल होत आहे.
आता शहरी भागातही पाणी बचतीची चळवळ निर्माण झाली पाहिजे त्याची सुरुवात आपल्यापासून करुन पाणी बचतीसाठी आपल्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे. सातारा नगर परिषदेचा अमृत या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील पायाभूत सुविधेवर भर देण्यात येणार आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.  
प्रास्ताविक श्री. सातपुते म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी चळवळ उभी केली. त्याचाच आदर्श घेवून शासनाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून संवादपर्व उपक्रम सुरु केला आहे. शासनाने राबविलेल्या योजना त्यांची माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी हा त्याचा मुख्य उद्देश आहे. लोकांनीही पंतप्रधान पीक विमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, सुकन्या योजना, आपले सरकार, महाराष्ट्र स्वच्छता अभियान अशा विविध योजनांची माहिती करुन घेतली पाहिजे. त्याचबरोबर शासनाच्या या अभियानामध्ये त्यांनी योगदानही द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी केले तर   जिल्हा कार्यक्रमास कूपर कॉलनी  येथील नागरिक, महिला, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                 
दोन कॉलनी एक गणपती राबवा
     जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल यांनी सर्वप्रथम मोरया ग्रुप गणेशोत्सव मंडळाची आरती केली. त्यानंतर त्यांनी कूपर कॉलनी सांस्कृतिक  मंडळात गणेश आरती केली. यानंतर ते म्हणाले, एक गाव एक गणपती ही योजना प्रशासन राबवत असताना शहरी भागात किमान दोन कॉलनी एक गणपती ही योजना राबवावी. मोठ्या मनाने यासाठी दोन्ही कॉलनींनी पुढाकार घ्यावा आणि पुढील वर्षी सर्वांनी मिळून एकच गणेशोत्सव साजरा करावा.

0000

No comments:

Post a Comment