Monday, February 28, 2022

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार दोन वर्षात योजना पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 


मुंबई, दि. 28 :- राज्यातील महत्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय, रोजगाराचे महत्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न उद्धभवतो आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, ही योजना दोन वर्षात पूर्ण करा, असे निर्देश देत या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. निधी अभावी ही योजना रखडणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात सोलापूर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (व्हिसीद्वारे), महसूल विभागाचे अपरमुख्य सचिव नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय जयस्वाल, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिव शंकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर(व्हीसीद्वारे) आदी मान्यवरांसह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एकरूख तलाव पाणी पुरवठा योजना, भिमा नदी टाकळी पाणीपुरवठा योजना, उजनी जलाशय योजना या तिन्ही योजनांतून व्यवहार्य आणि खात्रीशीर स्त्रोत तपासल्यानंतर सोलापूर शहरास पिण्यासाठी उजनीतून पाणीपुरवठा करणे सोयीचे होणार असल्याचे निदर्शनास येत आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारी जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे आता निधी अभावी ही योजना रखडणार नाही. सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
सोलापूर शहर पाणीपुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा, सध्याची 110 एमएलडी क्षमतेची योजना सुधारित करून ती 170 एमएलडी करताना सन 2035 ला सोलापूर शहराला लागणारे पाणी विचारात घ्यावे, सोलापूर सीटी डेव्हलेपमेंट कार्पोरेशन, महानगरपालिका, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी समन्वयाने काम करून या योजनेच्या कामाला गती द्यावी, ही योजना येत्या दोन वर्षात पूर्ण करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.
000000000000

Tuesday, February 15, 2022

अल्पसंख्याकांसाठी कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आता मिळणार ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज - अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय

 


मुंबई, दि. 15 : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मंत्री श्री. मलिक म्हणाले की, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत सध्या एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्याकरीता ५ लाख रुपये इतकी कर्ज मर्यादा आहे, ती वाढवून आता ७ लाख ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या भागभांडवलामधून राबविल्या जाणाऱ्या मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेसाठी सध्या असलेली २ लाख ५० हजार रुपयांची कर्जमर्यादा वाढवून आता ती ५ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. यामुळे एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पुरेसे शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार असून त्यांचा शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलातही राज्य शासनाने आता ७०० कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत आहे. यापुढील काळातही महामंडळाच्या विविध योजनांसाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक म्हणाले.
००००

Monday, February 14, 2022

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली सिरम इन्स्टिट्यूटला भेट कोरोना संकटात केलेल्या कामगिरीचा देशाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो-उद्योग मंत्री सुभाष देसाई

 


पुणे, दि. १४:- सायरस पुनावाला यांच्या जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर सिरम इन्स्टिट्यूट ही संस्था उभी असून संस्थेने कोरोना संकटात केलेल्या कामगिरीचा महाराष्ट्रासोबतच देशाला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.
उद्योग मंत्री देसाई यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देवून येथील लस उत्पादन प्रक्रियेची माहिती घेतली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, संजय देशमुख, इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश देशपांडे, कार्यकारी संचालक उत्पादन उमेश शालीग्राम, उपसंचालक उमेश शिरसावकर आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत सायरस पुनवाला यांच्याशी संपर्क करीत होते. कोविड लसीमुळे आपल्याला सुरक्षितता वाटत असून नागरिक आत्मविश्वासने घराबाहेर बाहेर पडतांना दिसत आहेत. कोरोना संकटातून बाहेर काढण्यात सिरम इन्स्टिट्यूटचे योगदान महत्वपूर्ण आहे. संस्थेने यापुढेही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन लस निर्मितीचे कार्य सुरुच ठेवावे, असेही ते म्हणाले.
यावेळी उमेश शालीग्राम यांनी येथील कामकाजाची माहिती दिली.

सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 



पुणे, दि. १४: महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महात्म्यांनी केलेले कार्य त्यांचे जीवन चरित्र अभ्यासून हे कार्य आपण पुढे नेले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (दूरदृष्य प्रणालीद्वारे) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
श्री. कोश्यारी पुढे म्हणाले, फुले दांपत्याने ज्यावेळी समाजसुधारणेचे काम केले त्या काळात इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा समाजाला कुप्रथांपासून दूर करणे अधिक कठीण होते. त्या काळात समाजातील सर्वात दबलेल्या महिला, मातृशक्ती तसेच मागास, गरीब समाजाच्या उत्थानासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी काम केले. त्यांच्या शिक्षणप्रसाराच्या, समाजसुधारनेच्या कामाला प्रचंड विरोध झाला परंतू कुप्रथा दूर करण्याचे त्यांनी जे स्वप्न पाहिले ते जीवनाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी काम केले.
सावित्रीबाई यांच्या जीवनाचा कालखंड हा इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवण्याचा, लिहिण्याचा कालखंड होता असेही श्री. कोश्यारी म्हणाले. सावित्रीबाई जर आज असत्या तर विद्यापीठे, शैक्षणिक क्षेत्रात मुली, महिलांचे अग्रस्थान पाहून त्यांना अतिशय आनंद वाटला असता असेही ते म्हणाले.
*सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्याच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न रहाता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या नावाला साजेसे असे अभ्यासक्रम राबवावेत, जेणेकरून विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देश आणी समाज निरोगी असावयास हवा यासाठी समाजाला विचार देण्यासोबत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या वर्तनात तो विचार आणला. देश स्वतंत्र झाल्यावर तो रुढी परंपरांमध्ये अडकलेला नसावा यासाठी महात्मा फुले आणि इतर समाजसुधारकांनी प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे इतरांना प्रकाश देण्याचे कार्य केले. त्यांचा ज्ञानार्जनाबाबतचा विचार स्वीकारला तर प्रगती शक्य आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी कार्य केले. प्रत्येकाला मर्यादेचे भान आले आणी भेद बाजूला सारता आले तर खऱ्या अर्थाने हे विचार समाजापर्यंत पोहोचले असे म्हणता येईल.
*शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा नसावा-छगन भुजबळ*
श्री.भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनावर जगातील विविध भाषेत प्रकाशित झाले आहे. त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या जीवनावर लहान पुस्तिका तयार करण्यात येणार आहेत. सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. या वास्तूचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.
सामाजिक कार्य करणाऱ्या द्रष्ट्या महापुरुषांचे महत्व कळायला समाजाला उशीर लागतो. महात्मा फुले यांचा पहिला पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे बसविला. अशा महापुरुषांमुळे सामान्य माणसाला समाजात प्रतिष्ठा मिळण्याचे कार्य झाले. सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत फातिमाबी शेख या महिलेने शिक्षणाचा आग्रह धरला. प्रत्येक भेद दूर सारण्याच्या महापुरुषांनी प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा न देता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, त्यातून त्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडून येईल, असे त्यांनी सांगितले.
*महात्मा फुले अध्यासनासाठी राज्य शासन 3 कोटी देणार : उदय सामंत*
श्री.सामंत म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी शासनस्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. समाजहिताच्या कोणत्याही कामासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात येतो. राज्यस्तरावर विविध महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी ३ कोटी रुपये देण्यात येतील. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र दर्शवणारी शिल्पे, लाईव्ह शो आदी बाबींच्या निर्मितीसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते श्री.फडणवीस म्हणाले, आज शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम असलेली महिला समाजात दिसते, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांचे आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याला सावित्रीबाईंची साथ होती. त्या द्रष्ट्या समाजसुधारक होत्या. त्यांनी आणि महात्मा फुले यांनी समाजाला संघर्ष शिकविला. न्याय आणी ज्ञान यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. अनेक हालअपेष्टा सहन करताना त्यांनी संघर्ष केला. विधवांच्या मुलांचे संगोपन, अंधश्रद्धेचा विरोध, बालहत्येचा विरोध अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचा 'काव्यफुले' हा संग्रह ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाला समर्पित आहे.
*सावित्रीबाई लिंग समानता चळवळीच्या आधारस्तंभ: डॉ. नीलम गोऱ्हे*
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचे कार्य अजरामर आहे. अनेक समाजसुधारकांनी या राज्यात समाजजागृतीचे कार्य केले. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना प्रगतीची संधी मिळाली. त्या कृतिशील समाजसुधारक आणी तत्वचिंतक होत्या. विधवा महिलांची बाळंतपणं त्यांनी केली होती. सावित्रीबाई फुले लिंग समानतेच्या चळवळीचा आधार होत्या. समाजातील तेढ बाजूला सारून एकरूप करण्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार अध्यासनाच्या माध्यमातून व्हावा. त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरतील, असे त्या म्हणाल्या.
कुलगुरू डॉ.करमळकर म्हणाले, समाजाच्या उद्धारासाठी शिक्षण हे एकमात्र साधन आहे हे लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि वंचितांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी सामाजिक कार्यातही आदर्श प्रस्तूत केला. हा आदर्श विद्यार्थ्यांसमोर प्रस्तूत करण्यासाठी विद्यापीठ परिसरात पूतळा उभारण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. सावित्रीबाई फुले यांचा पुतळा १५०० किलो ब्रांझचा आणी साडेतेरा फुटाचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने सर्व परवानग्या तातडीने मिळाल्या. अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनीदेखील विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाला उपमहापौर सुनिता वाडेकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता आदी उपस्थित होते. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मूर्तीकार संजय परदेशी यांचा सत्कार राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आला. हरी नरके लिखीत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
000