Wednesday, June 29, 2022

वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाची विविध पथके तैनात जाग्यावरच केले जात आहे औषधोपचार पहिल्याच दिवशी साडेचार हजार वारकऱ्यांवर उपचार

 




  

 

सातारा दि. 29 : संतश्रेष्ठ श्री  ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम जिल्ह्यात 6 दिवस आहे. या मुक्काच्या कालावधीत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना जाग्यावरच औषधोपचार केले जात आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काल लोणंद येथे मुक्कामी आला असून या पहिल्याच दिवशी साडेचार हजार वारकऱ्यांवर औषधोपचार करण्यात आले,  अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार यांनी दिली आहे.

 

पालखी मार्गावर आरोग्य विभागाकडून 21 स्थायी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.  संर्पदंश, कुत्रे चालवण्यानंतरची लस, कोविड लसही वारकऱ्यांसाठी आरोग्य पथकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

            तात्काळ सेवा देण्यासाठी विशिष्ट अशी  कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. यामुळे कोणताही गरजु  वारकरी औषधोपचारापासून वंचित राहणार नाही. त्याचबरोबर 17        आरोग्य दुतांची फिरते पथक तयार करण्यात आली आहे. या पथकांमार्फत सर्व दिंड्यांना भेट देवून आजारी वारकऱ्यांची तपासणी करुन जाग्यावरच औषधोपचार करण्यात येणार आहेत. तसेच वारकऱ्यांना आरोग्य शिक्षणही दिले जात आहे. कोविड टेस्ट करण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पालखी मार्गावर 34 पाणी शुद्धीकरण पथके  तैनात करण्यात आली आहेत. यांच्यामार्फत पालखी मार्गावरील विहिरी व टँकरमधील पाण्याचे नमुने तपासणी करण्यात येत आहे. तसेच मार्गावरही हॉटेलमधील पाण्याची तपासणीबरोबरच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत. पालखी सोहळ्यात महिलांचाही मोठा सहभाग असतो ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने महिलांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक पथकात स्त्री वैद्यकीय अधिकारी यांचीही नेमणुक करण्यात आली आहे. तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाकडूनही विशेष पथक तैनात करण्यात आले आहे असेही डॉ. पवार यांनी सांगितले आहे.

00000

 

Wednesday, June 15, 2022

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुळापूर, वढू (बु.) येथील स्मारकांबाबत शिखर समितीची बैठक

 




मुंबई, दि.15 :- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. 
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे  आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 
बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, खासदार डॉ.अमोल कोल्हे (दूरदृष्य प्रणालीद्वारे ) आमदार अशोक पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे,  मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव विकास खारगे उपस्थित होते. 
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयात आहेतच. त्यांचे स्मारक देखील मनाचा ठाव घेणारे आकर्षक आणि भव्य असावे. संभाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय असे होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वांच्या घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक असले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनां सादर केल्या जाव्यात. त्या त्रिमितीय स्वरुपात सादर करण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
 उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, तरुणांमध्ये ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, स्मारक याबाबत मोठे आकर्षण आहे. अशा  ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता गर्दी होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून सर्वसमावेशक आकर्षक स्मारक झाले पाहिजे तसा आराखडा पुन्हा शिखर समितीसमोर सादर करावा. 
महसूल मंत्री श्री. थोरात म्हणाले,  देश-विदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पर्यटकांना देशात आल्यानंतर किंवा राज्यातील पर्यटकांना सुद्धा हमखास या स्मारकास  भेट द्यावी असे वाटावे इतके सुंदर,माहितीपूर्ण आणि आपल्या इतिहासाची साक्ष देणारे हे स्मारक असावे तसा आराखडा तयार करून  नियोजन करावे. 
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले,  स्मारक करताना विविध संकल्पना यामध्ये राबविल्या पाहिजे. बहुपर्यायी असा आराखडा तयार करून स्मारक उभारताना यामध्ये नाविन्यता आणि  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  करावा
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले, स्मारकांच्या ठिकाणी जयंती व बलिदान दिन या दोन्ही दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. येणाऱ्या नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत.तसेच या भागातील पूररेषेचा अभ्यास करून हा आराखडा तयार करावा असे यावेळी सांगितले.
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सादरीकरण केले. भिमा-भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी स्मारक साकारण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली. तुळापूर येथे आठ एकर तर वढू (बु) येथे सुमारे ४ एकर क्षेत्रावर स्मारक परिसर साकारण्यात येणार आहेत. शिखर समितीपुढे सादर केलेल्या आराखड्यात स्मारक परिसरात भव्य शिल्प, ॲम्फीथिएटर, प्रवेशद्वार, इमारत बांधकाम, घाट बांधकाम, संग्रहालय, प्रेक्षागृह, प्रकाश व ध्वनी शो, पायाभूत सुविधांतर्गत पाण्याच्या टाक्या, विद्युतीकरण, सौर ऊर्जा पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, संरक्षक भिंत याबरोबरच अस्तित्वातील समाधीचा जीर्णोद्धार आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
याबैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे आदी मान्यवर व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
 0000

बोंडारवाडी धरणासाठी आवश्यक निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

 



मुंबई दि. 15 : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील 54 गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण बांधण्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ भारत पाटणकर आदी उपस्थित होते.

 

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील 54 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रस्तावित आहे. जावळी तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे सदरचे धरण लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. डॉ. भारत पाटणकर यांनी 54 गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरण आवश्यक आहे असे सांगितले.

 

यावर धरणाच्या पुर्ततेसाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने आवश्यक कार्यवाही करावी. धरणासाठी आवश्यक असणारे सर्व्हेक्षण करुन घ्यावे. सर्व्हेक्षण साठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

 

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यावर जलसंपदा विभागाने धरणाचे सर्व्हेक्षण, अन्वेषण आणि संकल्पन याबाबतची कार्यवाही करावी. अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

 

बैठकीस नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभाग प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहाणे, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, पुनर्वसन विभागाचे उपसचिव धनंजय नायक, विशेष कार्यकारी अधिकारी सी. आर. गजभिये आदी उपस्थित होते.

 

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी  दूरदृष्यप्रणालीव्दारे  बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत माहिती दिली. त्यांनी धरण प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आणि भविष्यात करावयाच्या कामाबाबत माहिती दिली.

 

                                                             0000


Tuesday, June 14, 2022

विकास आणि वारसा दोन्ही सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

 



पुणे दि.१४: देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास होत असताना विकास आणि देशाचा वैभवशाली प्राचीन वारसा सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. 


देहू येथे आयोजित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, वारकरी संप्रदायाचे मारुतीबाबा कुरेकर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, तुषार भोसले आदी उपस्थित होते. 


प्रधानमंत्री म्हणाले, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक असल्याचा आपल्याला अभिमान आहे, याचे श्रेय भारतीय संत परंपरेला आणि ऋषी मुनींना आहे. राष्ट्रीय ऐक्य मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरेचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. भारत ही संतांची भूमी असल्याने या देशाचा विचार शाश्वत आहे. प्रत्येक काळात महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्या शाश्वत मूल्यांचे रक्षण  केले आणि देश व समाजाला मार्गदर्शन केले. समाजातील अखेरच्या व्यक्तींचे कल्याण करावे हाच संतांचा संदेश आहे. या संदेशानुसार गरिबांचे कल्याण ही देशाची प्रथमिकता आहे. 


संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने अनेक पिढ्यांना प्रेरणा

संत भिन्न परिस्थितीत समाजाला मार्गदर्शन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या जीवनात संत तुकाराम यांच्यासारख्या संतांची महत्वाची भूमिका आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असताना तुकाराम महाराजांचे अभंग म्हणत. संत तुकारामांची करुणा, दया आणि सेवेचा बोध त्यांच्या अभंगाच्यारुपाने आजही आपल्यात आहे. या अभंगांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आजही हे अभंग आपल्याला ऊर्जा देतात, मार्गदर्शन करतात. ऐक्यासाठी संत विचारांच्या प्राचीन परंपरेला जपावे लागेल. 


प्रयत्नातून अशक्याला शक्य करता येते हे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. देशात पर्यावरण, जलसंरक्षण आणि नदी वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आपल्या अध्यात्मिक परंपरेशी हे विषय जोडल्यास पर्यावरणाचे मोठे काम होईल. सेंद्रिय शेतीला प्रत्येक शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी मिळून प्रयत्न करावे लागतील. योग ही भारताची जगाला देणगी आहे असे सांगून आंतरराष्ट्रीय योग दिवसात सर्वांनी सहभाग व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 


संत तुकाराम महाराज शिळा बोध आणि वैराग्याची साक्ष

तुकाराम महाराजांनी जीवनात भूक आणि दुःख पाहिले. संकटकाळात कुटुंबाच्या संपत्तीला जनसेवेसाठी समर्पित केले. त्यांचे कार्य भविष्यासाठी आशेचा किरण आहे, तर ही शिळा त्यांच्या बोध आणि वैराग्याची साक्ष आहे. संतांच्या अभंगवाणीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आज देश सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे पुढे जात असताना अभंग समाजाला मार्गदर्शन करीत आहेत. मराठी संतांच्या अभंगवाणीतून नित्यनवी प्रेरणा मिळते. तुकाराम महाराजांनी माणसात भेदभाव करणे मोठे पाप म्हटले आहे. समाजासाठी हा संदेश महत्वाचा आहे असेही ते म्हणाले. 


श्री.मोदी म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यात आणि आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. या दोन्ही एकूण ३५० किलोमीटरपेक्षा अधिक चौपदरी मार्गासाठी ११ हजार कोटीपेक्षा अधिक खर्च होणार आहे. या मार्गामुळे परिसरातील विकासालाही गती मिळेल. शास्त्रात म्हटले आहे मानवजन्मात संतसंग सर्वात महत्वाचा आहे, त्यांच्या सहवासात सुखाची अनुभूती असते. असा अनुभव देहूसारख्या तीर्थक्षेत्री आल्यावर मिळतो. 


यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री.फडणवीस यांनीही विचार व्यक्त केले. तुकाराम महाराजांनी समाजाला अंधश्रद्धेपासून दूर नेत अध्यात्म मार्ग दाखविला असे त्यांनी सांगितले. नितीन महाराज मोरे यांनी प्रास्ताविक केले. 


प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते संत चोखामेळा सार्थ अभंग गाथेचे विमोचन करण्यात आले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी तिन्ही संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. 


तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण आणि ध्वजपूजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यांनी इंद्रायणी नदी, भंडारा, घोरवडेश्वर आणि भामगिरी टेकडीचे दर्शन घेतले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी संत तुकाराम महाराज लिखित अभंगगाथेची हस्तलिखित प्रत आणि पालखीचेही दर्शन घेतले.

000

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत


पुणे,दि.14: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान महोदयांचे स्वागत केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान महोदयांचे स्वागत केले.
यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सर्वश्री सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चंद्रकांत पाटील, लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन,पोलिस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, वायुसेनेच्या पुणे विभागाचे प्रमुख एच. असुदानी यांनीही पंतप्रधान महोदय यांचे स्वागत केले.



Monday, June 13, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापूजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील - मुख्यमंत्र्यांची ग्वाही

 


           

मुंबईदि. 13 : - पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (10 जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदेॲड. माधवी निगडेज्ञानेश्वर जळगांवकरमंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

            निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी चर्चाही केली. "पंढरपूरातील विकास कामांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही,"अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

            गतवर्षी सत्यभामा मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणाची मुख्यमंत्र्यांनी आवर्जून माहिती घेतली. पंढरपूर मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी शासनाने ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत कामांबाबत चर्चा झाली. अशा पद्धतीने निधी देण्याचे जाहीर करूनतो लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले.

            मंदिर समितीच्यावतीने श्री. औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मूर्तीवीणाशेला-पागोटे देऊन सत्कारही केला.

0000

Friday, June 10, 2022

केंद्राच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत सातारा जिल्ह्याचा गौरव · राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन

 

 

 

            मुंबईदि. 10 : केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धा 2020-21’ मध्ये सातारा जिल्ह्याला उल्लेखनीय कार्यासाठी दिल्ली येथे उत्कृष्टता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आल्याने कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाचेकौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अभिनंदन केले आहे. सातारा जिल्हा कौशल्य नियोजन आराखड्यात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या पुढच्या काळात सातारा जिल्हा अव्वल दर्जाची कामगिरी करेलअसा विश्वासही राज्यमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

            उत्कृष्टता पुरस्कार श्रेणीत निवड झालेल्या देशातील 8 जिल्ह्यांमध्ये सातारा पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आहे. कोविड महामारीच्या काळात केंद्र आणि राज्यशासनाच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कोविड काळात कार्यरत असणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील जवळपास एक हजार  कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. साहसी खेळग्रामीण व कृषी पर्यटनासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली. यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री म्हणून वेळोवेळी आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. कोविडमुळे विधवा झालेल्या भगिनी आणि कातकरी समाजातील लोकांना येत्या काळात कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण व कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या या कामांना गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.  सातारा जिल्ह्याचा झालेला सन्मान जिल्हा प्रशासनाला प्रोत्साहन देणार आहेअसे राज्यमंत्री श्री.देसाई यावेळी म्हणाले. केंद्रीयस्तरावर सन्मान झालेल्या वाशिमसिंधुदुर्गठाणे आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाचेही यावेळी त्यांनी अभिनंदन केले.

                दिल्ली येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सभागृहात केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात  मंत्रालयाचे सचिव  राजेश अग्रवाल यांच्या हस्ते‘ जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे’ (२०२०-२१) पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६७ जिल्ह्यांतून निवडल्या गेलेल्या ३० जिह्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये यावेळी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना तीन श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील ४६७ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाने पुरस्कार निवडीसाठी  दिल्ली आणि खरगपूर आयआयटीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली होती.

००००







 #खरीप हंगामासंदर्भात #कृषी विभागाच्या नियोजनासंबंधी माहिती देणारी कृषीमंत्री @dadajibhuse  यांची मुलाखत #दिलखुलास कार्यक्रमात दि. ११ व १३ जून रोजी स. ७.२५ वाजता तर @MahaDGIPR च्या समाजमाध्यमांवरून #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात १६ जूनला सायं. ७.३० वाजता प्रसारित होईल.

Friday, June 3, 2022

‘बेटी बचाव बेटी पढाव’ शिल्प प्रेरणादायी ठरेल-राज्यमंत्री कु.आदिती तटकरे तळेगाव दाभाडे येथे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ शिल्पाचे अनावरण

 




पुणे दि.३- मुली आणि महिलांच्या प्रगतीशील वाटचालीचे उद्दीष्ट समोर ठेऊन तळेगाव दाभाडे नगर परिषद क्षेत्रात उभारण्यात आलेले ‘बेटी बचाव बेटी पढाव’ शिल्प प्रेरणादायी ठरेल. या शिल्पाची प्रतिकृती आपल्याही भागात उभारू, असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात आलेल्या ‘बेटी बचाव बेटी पढाव’ शिल्पाच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके, बबन भेगडे, गणेश खांडगे, तहसिलदार मधुसुदन बर्गे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, एखाद्या भागातील चांगल्या विकासकामांचे अनुसरण इतर भागातही होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी चांगल्या कामांची माहिती घेतल्यास आपल्या भागात चांगली कामे करता येतील. मावळ परिसरात वेगाने विकासकामे होत आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकप्रतिनीधी म्हणून आपण केलेल्या कामावर पुढे संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण मिळाल्याने जनतेचे काम करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी मिळाल्यानंतर आपल्या कामावर यश अवलंबून असते, असेही त्या म्हणाल्या.
आमदार शेळके म्हणाले, स्त्री भृणहत्या थांबली पाहिजे, मुलींना शिक्षण मिळायला हवे आणि त्यांना स्वावलंबी करायला हवे. समाजामध्ये ही बाब रुजविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. विशेषत: ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळावे यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते तळवडे येथील उद्यानाचे उद्घाटन

 


पुणे दि.३- पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील तळवडे येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यान व जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री.पवार यांनी उद्यानाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी आयुक्त राजेश पाटील, उपायुक्त विकास ढाकणे, सह शहर अभियंता सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे आदी उपस्थित होते.
तळवडे उद्यान अंदाजे १ एकरामध्ये विकसित करण्यात आले असून त्यामध्ये ३०० मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खेळण्या, खुली व्यायाम शाळा, लॅन्डस्केपिंग, फलोत्पादनविषयक कामे करणेत आले आहेत.
*इको जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन*
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी भक्ती-शक्ती चौकातील इको जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन केले. ६ ते ८ मीटर रुंदी असलेले मातीचे जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आले असून वृक्षारोपण व लॉन तयार करण्यात आले आहे. सोबत खुली व्यायामशाळा व मुलांसाठी खेळण्याची जागा असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अद्ययावत बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन

 

पुणे दि.३- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सखुबाई गबाजी गवळी उद्यानासमोरील अद्ययावत बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन करण्यात आले.
या वाहनतळामुळे भोसरी येथून आळंदीकडे जाणारा मुख्य रस्ता बाजारपेठेतील असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर तळमजला अधिक ३ मजले असे पार्किंग करण्यात येणार आहे. यामध्ये ७५ चारचाकी तर १५० दुचाकी वाहने पार्क करण्याची व्यवस्था आहे. वरील मजल्यांवरून ये-जा करण्याच्या दृष्टीने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्वाहकचे नियोजन करण्यात आले आहे.
चिखली जलशुद्धीकरण केंद्राला भेट व पाहणी
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी चिखली जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. या योजनेमुळे मनपा हद्दीत नव्याने जोडल्या गेलेल्या (२००८ ते २०१० या कालावधीतील) गावांची पाण्याची मागणी पूर्ण करणे शक्य आहे. योजनेमुळे सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर येणारा भार कमी होऊन शहरातील सर्व भागांना पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.
See insights
Boost a Post
4

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध विकासकामांचे उद्घाटन

 


पुणे दि.३- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता स्मार्ट बाईक मोटार सायकल्स हस्तांतरण, ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकराणाचे वाटप तसेच अग्निशमन दूचाकी वाहनांचे लोकार्पणदेखील करण्यात आले.
कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.
*औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्ष*
शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तथा उद्योग समूहाद्वारे प्राप्त होणाऱ्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून शहराच्या विकासात भर घालण्यासाठी समन्वय साधण्याचे कार्य या कक्षामार्फत करण्यात येईल. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण प्रकल्पाद्वारे शहराचा शाश्वत विकासासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.
महानगरपालिकेचे विविध उपक्रम, योजना, कार्यक्रम शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कल्याणकारी योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता तसेच उद्योग समूहाचा या कामात सहभाग वाढविण्याकरिता सामाजिक उत्तरदायित्व कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे. कक्षाच्या माध्यमातून खाजगी संस्था तसेच महानगरपालिका यांना एकत्रित आणून नव्या योजना, कल्पना, कार्यक्रम इत्यादींची आखणी आणि त्यांची अंमलबजावणी सुलभ होणार आहे.
*उद्योग सुविधा कक्ष वैशिष्ट्ये*
शासकीय संस्था आणि उद्योग यांच्यातील संवाद सुनिश्चित करण्याचा उद्योग सुविधा कक्ष पंच तारांकित एक खिडकी सुविधा आहे. पिंपरी चिंचवडमधील व्यापार आणि उद्योगांची वाढ सुलभ करण्यासाठी आणि औद्योगिक प्रतिनिधीत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महापालिकेच्या उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे. उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि चेंबर ऑफ कॉमर्स आणि मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात कक्षामुळे मदत होईल*
*अग्निशामक मोटार सायकल्सचे हस्तांतरण*
पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अरूंद रस्ते, गल्लीबोळ, मार्केट परिसर, इत्यादी ठिकाणी आग विझविण्यासाठी अग्निशामक जवानास तातडीने व सहजपणे पोहचण्यास या वाहनांमुळे मदत होणार आहे. या वाहनात २०+२० लीटर क्षमतेच्या २ पाण्याच्या टाक्या आहेत. घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक बाजूला करण्यासाठीदेखील वाहनांची मदत होणार आहे.
*ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकरणचे वितरण*
हे अँड्रॉइड प्रणाली आधारित यंत्र असून डिजिटल पावती,डिजिटल पेमेंट, वाहतूक विभागाच्या वाहन प्रणालीशी सुसंगत आहे. या उपकरणाच्या वापरामुळे दंडाची रक्कम जागेवर प्राप्त होऊन त्याची पावती नागरिकास देण्यात येणार आहे. या उपकरणाचा वापर करणे महापालिकेस सुलभ ठरणार असून कारवाईमध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे
*पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता ५० स्मार्ट मोटारसायकल्सचे हस्तांतरण*
शहरामधील वाहतूक कोंडी, गुन्हेगारी व चोऱ्या यांचे पोलिस पथकामार्फत पेट्रोलिंग करण्याकरिता स्मार्ट मोटारसायकल्सचा वापर करण्यात येणार आहे. पोलिस विभागाला कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी या दुचाकी वाहनांची मदत होणार आहे.
-------

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

 


पुणे दि.३-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मान्यतेने व महाराष्ट्र हॉकी औंध, पुणे यांच्यावतीने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.पवार यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली.
भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धाच्या अनुषंगाने व शहरास देशाची क्रीडा राजधानी म्हणून ओळख निर्माण व्हावी व पिंपरी चिंचवड शहरामध्ये हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या व हॉकी महाराष्ट्र औंध पुणे यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे खेळाडू निर्माण करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.