महाराष्ट्र राज्य शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, वृत्त, लेख, छायाचित्र आदींची माहिती उपलब्ध करून देणे व याद्वारे ते जनतेपर्यंत पोहोचविणे. राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.
Friday, June 30, 2017
आषाढीवारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज: जिल्हाधिकारी डॉ. भोसले
पंढरपूर दि. 30 :- पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा 4 जुलै 2017 रोजी होत आहे. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली,
जगदगुरूसंततुकाराम महाराज यांच्या पालख्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. आषाढी वारीसाठी येणाऱ्या पालख्यांना मुक्कामाच्या ठिकाणी आणि वारकरी-भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा देण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
आषाढी वारीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी भोसले पंढरपुर मुक्कामी आहेत. वारकरी आणि भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना कार्यरत केले आहे. डॉ.
भोसले म्हणाले,
यंदाच्या आषाढी वारीत वारकरी केंद्रबिंदू मानून आवश्यक सेवा सुविधा देण्यास प्रशासन आणि मंदिर समितीने प्राधान्य दिले आहे. मंदिर समितीमार्फत दर्शन रांगेसाठी तात्पुरती पत्राशेड उभारण्यात आली आहे.
या ठिकाणी 80 हजार भाविकांची सोय होणार आहे. दर्शन मंडपात हवा खेळती रहावी यासाठी नवीन पंखे आणि इतर सुरक्षेची कार्यवाही करण्यात आली आहे.
वारी कालावधीत स्वच्छता व आरोग्य सुविधेला प्राधान्य दिले असून मंदिर परिसर,
दर्शन मंडप, पंढरपूर शहरात याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकाला अधिकच्या सुविधा मिळाव्यात. आषाढीवारीसाठी येणारे भाविक-वारकरी केंद्रबिंदू मानून त्यांना सुविधा देण्यास प्रशासन सज्ज आहे. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची खबरदारी प्रशासनामार्फत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
65 एकर येथे वारकऱ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली असून या ठिकाणी हायमास्ट प्रकाश योजना ,24 तास पिण्याचे पाणी,
आरोग्य सुविधा आणि आपत्ती प्रतिसाद व मदत केंद्रे(Emergency Operation
Center) कार्यान्वित करण्यात आले आहे. 65 एकर, पालखी मुक्काम, वाळवंटामध्ये पुरेशी शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली, असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली.
वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीसांच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी शेजारील जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
000000Thursday, June 29, 2017
जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अकलूजला उत्स्फुर्त स्वागत
पंढरपूर दि. 29 :- जावू देवाचिया गावा...देव देईल विसावा पंक्तीनुसार श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्यातील पहिले रिंगण अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या मैदानावर झाले. लाखो वारकरी भाविकांनी हा रिंगण सोहळा नेत्रात साठवून घेतला.
नीरा नदी ओलांडून जिल्ह्यात दाखल झालेल्या संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. पालकमंत्री देशमुख यांनी अश्व पूजन केले. तद्नंतर जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचे मनोभावे पूजन करुन दर्शन घेतले. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार हणमंतराव डोळस, माळशिरसच्या सभापती वैष्णवीदेवी मोहीते पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू उपस्थित होते.
पालखी स्वागत ठिकाणापासून अकलूज येथील गांधी चौकापर्यंत पालखीच्या रथाचे सारथ्य पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले ही होते.
अकलूज गांधी चौकात अकलूज ग्रामपंचायतीच्यावतीने खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
रिंगण सोहळ्यास गर्दी
जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करुन अश्व रिंगणी धावले. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरला. अश्वाचे रिंगणात धावणे हा क्षण अकलूजकर आणि परिसरातील ग्रामस्थांसाठी नेत्रदीपक असा होता.
*****
Tuesday, June 27, 2017
माळीण पुनर्वसन कामाचा अहवाल येत्या दहा दिवसात सादर होणार-जिल्हाधिकारी सौरभ राव
*जिल्हाधिकारी राव यांच्याकडून माळीणची पाहणी
*ग्रामस्थांनी घाबरुन जावू नये, असे जिल्हाधिकारी
यांचे आवाहन
पुनर्वसित माळीणमध्ये झालेल्या पहिल्या मोठ्या पावसानंतर माती खचल्यामुळे बांधकामाला तडे गेले तसेच पायऱ्या खचल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. राव यांनी आज माळीणला भेट देऊन विविध कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव एम.व्ही.पाटील, कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्रो.बी.जी.बिराजदार, स्ट्रक्चर इंजिनिअर मोहन साखळकर, तहसिलदार रवींद्र सबनीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधीत सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्री.राव म्हणाले, माळीण गावच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन
सर्वतोपरी प्रयत्न करेल. पहिल्या पावसानंतर खचलेले
रस्ते, पायऱ्या आदि कामे तात्काळ पूर्ण करुन घेण्यासाठी
मॉनेटरिंगची टिम नेमण्यात येत असून यात उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक
बांधकाम विभाग, विद्युत विभागाचे उपअभियंता, तसेच माळीण मधील पाच ग्रामस्थांचा या समितीमध्ये सहभाग असेल. समिती आवश्यक कामे दाखवून देईल. त्याप्रमाणे कामे तात्काळ पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. त्याचबरोबर पाऊस पडल्यानंतर ते पाणी वाहून जाण्यासाठी कोणत्या ठिकाणी
गटारे बांधणे आवश्यक आहे. याचा अभ्यास करण्यासाठी येत्या दोन
दिवसात अधिकारी नियुक्त करण्यात येतील ते अधिकारी येत्या दोन दिवसात माळीणमध्ये
थांबून तांत्रिकदृष्टया अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करतील. त्याप्रमाणे या अहवालानुसार डोंगर गटारी बांधण्यात येतील. जेणेकरुन पावसाचे पाणी अडल्यामुळे रस्ता व पायऱ्या खचणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले.
अपूर्ण कामे पुर्ण करण्यासाठी तसेच या भागात मोठया प्रमाणावर होणाऱ्या
पावसाचे प्रमाण पाहता आवश्यक कामे करण्यासाठी
लागणारा निधी मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याच्या टाकीची तसेच पाईपलाईनची
पाहणी करुन नादुरुस्त असल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी. गळती असणाऱ्या घरांच्या
छतांचीही तात्काळ दुरुस्ती करावी,अशा सूचना श्री राव यांनी केल्या.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.पाटील म्हणाले,
आंबेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे माळीणमध्ये जमीन
खचली जाते. यासाठी जिल्हा प्रशासनाने
पावसाचे प्रमाण आणि डोंगरावरुन वाहणाऱ्या पाण्याची दिशा आणि पाणी वाहून जाण्यासाठी
आवश्यक त्या उपाययोजनांबाबत अभ्यास करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करुन
उपाययोजना कराव्यात.
निवृत्त सचिव श्री. पाटील म्हणाले,
पुनर्वसीत माळीणच्या कामाच्या त्रुटींबाबत अभ्यास करुन लवकरच अहवाल
जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येईल. त्रुटी असणारी कामे,
त्रुटींचे कारण आणि त्यावर उपाययोजना अशा तीन टप्प्यात अहवाल सादर
करण्यात येईल. डोंगरावरुन वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याचा
निचरा कसा होईल हे पहाणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने उपाययोजना
करण्यात येतील.
प्रास्ताविक श्री.सबनीस यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री.राव यांनी ग्रामस्थांना
भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तात्काळ कामे पूर्ण
करुन घेण्यात येतील,असे अश्वासनत्यांनी ग्रामस्थांना दिले.
तसेच विद्युत पुरवठा, रस्ते व बांधकाम
दुरुस्ती तात्काळ करावी आणि पाणीपुरवठा सुरळीत करुन द्यावा, अशा
सूचना संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
0000
Tuesday, June 20, 2017
पंढरपूर शहरात दुचाकीवरील आरोग्यदूत सहाय्य करणार
आरोग्यमंत्र्यांनी घेतला
आढावा
मुंबई, दि. 20 : पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रेच्या
पार्श्वभूमीवर वारकरी व भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेबाबत
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज आढावा घेतला. आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील
रुग्णवाहिकेच्या सेवा, आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, पालखी मार्गावरील जलस्त्रोतांचे
शुध्दीकरण याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. वारी काळात पंढरपूर शहरात आरोग्यदूत
ही संकल्पना राबविण्यात येणार असून 30 दुचाकींच्या सहाय्याने आरोग्यदूत भाविक तसेच
वारकऱ्यांना आरोग्य सेवेबाबत सहाय्य करतील, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी
सांगितले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व
आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ.
बी.डी. पवार आदी यावेळी उपस्थित होते.
दिनांक 30 जून ते 9 जुलै या दहा दिवसांच्या काळात पंढरपूर शहरात
आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या भाविकांना त्रिस्तरीय पध्दतीने आरोग्य सेवा
पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व विठ्ठल रुक्मीणी
मंदिर परिसरात येथे अतिदक्षता कक्ष सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर पंढरपूर
शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्य
शासनाच्या आरोग्य विभागाचे 100 खाटांचे आरोग्य उपकेंद्र येथे कार्यरत आहे. त्याचबरोबर
50 खाटांचे संसर्गजन्य रुग्णालय देखील कार्यरत आहे. त्याचबरोबर सोलापूर
जिल्ह्यातील 18 धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून पंढरपूर येथे वारी काळात 24 तास
आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.
वारी काळात संपूर्ण पालखी मार्गावर आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील
(क्रमांक 108) 75 रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दोन मुख्य
पालखींसोबत 108 व 102 क्रमांक सेवेतील 12 रुग्णवाहिका देखील ठेवण्यात आल्या आहेत.
वारी काळामध्ये पंढरपूर शहरात आरोग्यदूत ही संकल्पना राबविण्यात
येणार असून 30 दुचाकींच्या सहाय्याने आरोग्यदूत भाविकांना आरोग्य सुविधेबाबत
सहाय्य करतील. हे आरोग्यदूत शहरातील पाणी शुध्दीकरण तपासणीबरोबरच आरोग्य
केंद्रांची माहिती देखील नागरिकांना देतील. त्याचबरोबर रुग्णवाहिका कोणत्या ठिकाणी
आहे याचे मार्गदर्शन करण्याबरोबरच गरज भासल्यास दुचाकीवरुन रुग्णाला जवळच्या
दवाखान्यात देखील उपचारासाठी नेण्यात येईल. फक्त पंढरपूर शहरातच 102 व 104 क्रमांक
सेवेतील 14 रुग्णवाहिका ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिका प्रसंगी
बाह्य उपचार केंद्र म्हणून देखील या काळात कार्यरत राहतील. पंढरपूर येथील उपजिल्हा
रुग्णालयात संपर्क कक्ष (02186-225101/225103) सुरु करण्यात येणार आहे. याबरोबरच
शहरात आठ ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
वारीच्या काळात 108 क्रमांकाच्या सेवेतील आपत्कालीन रुग्णवाहिकेचे
नियंत्रण कक्ष पंढरपूर येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे
नियंत्रण कक्षात आलेल्या कॉलला स्थानिक ठिकाणांवर अचूक पध्दतीने रुग्णवाहिका
पाठविणे सुलभ होणार आहे. पंढरपूर शहरात येणाऱ्या पालखी मार्गावरील आरोग्य
संस्थांमधील सर्व प्रकारच्या सेवा पुरविण्यासाठी त्यांचे बळकटीकरण करण्यात आले
आहे.
पालखी मार्गावरील सर्व जलस्त्रोतांची तपासणी करुन त्याचे
क्लोरीनेशन करण्यात आले आहे. टँकरमध्ये पिण्याचे पाणी भरण्यासाठी जागा निश्चित
करण्यात आल्या असून त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. ज्या
ठिकाणी पालखी मुक्कामाला असते त्याच्या दोन दिवस आधी त्या भागात डास प्रतिबंधक
फवारणी केली जाते. वारी काळात भाविकांना दर्जेदार आणि तत्पर सेवा देण्यासाठी
आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस आरोग्य विभागाचे पुणे विभागीय उपसंचालक डॉ. संजय देशमुख,
सोलापूर येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी यांच्यासह वरिष्ठ
अधिकारी उपस्थित होते.
००००
अजय
जाधव/विसंअ/20/6/17
Monday, June 19, 2017
केंद्रीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला 9 राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली, 19 : प्रधानमंत्री
आवास योजना (ग्रामीण) आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनांसह केंद्रीय योजनांची प्रभावी
अंमलबजावणी करणा-या महाराष्ट्राला केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल मंत्री
नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
येथील
विज्ञान भवनात आज केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल मंत्रालयाच्या वतीने
वार्षीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मंत्रालयाअंतर्गंत देशभर राबविण्यात
येणा-या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या राज्यांच्या विविध संस्थांना
यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय ग्रामीण
विकास, पंचायतीराज व पेयजल राज्यमंत्री रामकृपाल यादव, सचिव अमरजीत सिन्हा यावेळी
उपस्थित होते. विविध श्रेणींमध्ये यावेळी पुरस्कार वितरीत करण्यात आले. राज्याच्या
ग्रामीण विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, राज्य ग्रामीण रस्ते विकास विभागाचे
सचिव व्ही.आर.नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
प्रधानमंत्री आवास
योजनेसाठी (ग्रामीण) राज्याला 5 पुरस्कार
अंमलबजावणीत
सातारा जिल्हा ठरला अव्वल
प्रधानमंत्री
आवास योजनेअंतर्गत(ग्रामीण) लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, उपग्रहाद्वारे
निरिक्षण (जिओ टॅगींग) आणि घरकुलांना
मंजुरी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला असून आज सुवर्ण पदकाने राज्याचा गौरव
करण्यात आला. राज्याच्या ग्रामीण विकास
विभागाचे सचिव असिम गुप्ता आणि ग्रामीण गृह निर्माण विभागाचे संचालक भारत शेंडगे
यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातून
सातारा जिल्हयाची निवड करण्यात आली असून सातारा जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या योजनेची
सर्वचक्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी
करण्यात राज्य प्रथम स्थानावर राहीले आहे. या उपलब्धीसाठी सातारा जिल्हयाला सुवर्ण
पदकाने सन्मानीत करण्यात आले. सातारा जिल्हयातील कराडचे गट विकास अधिकारी अविनाश
फडतरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात
थेट निधीचे वितरण करणे व घरकुलांना मंजुरी देण्यात उत्तम कार्य केल्याबद्दल
राज्याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले. ग्रामीण गृह निर्माण विभागाच्या उपसंचालक
विना सुपेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या योजनेअंतर्गत गवंडी प्रशिक्षण देण्यात देशात महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर असून
यावेळी कांस्य पदकाने राज्याला सन्मानीत करण्यात आले. ग्रामीण गृह निर्माण
विभागाचे मुख्य अभियंता एस.आर.मालपानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हरित
तंत्रज्ञाच्या प्रयोगासाठी राज्याचा सन्मान
प्रधानमंत्री
ग्राम सडक योजनेअंतर्गंत राज्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण
करण्यासाठी हरित तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी
महाराष्ट्राला तिस-या क्रमांकाच्या
पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. राज्य ग्रामीण रस्ते विकास विभागाचे सचिव व्ही.आर.नाईक
यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्हयाचा सन्मान
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार योजनेच्या (मनरेगा)प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातून गोंदिया जिल्हयाला सन्मानीत करण्यात
आले. जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी रविंद्र
ठाकरे आणि माजी जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मनरेगा विशेष गणकात
अमरावतीचा सन्मान
मनरेगाच्या अमंलबजावणीत तांत्रिक दृष्टया प्रभावीपणे कार्य
करण्यासाठी राज्यातून अमरावती जिल्हयाचा
सन्मान करण्यात आला. अमरावती जिल्हयातील चिखलदरा तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीला
हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तांत्रिक अधिकारी निकेश निंबाळकर यांनी हा पुरस्कार
स्वीकारला. चिखलीसह देशातील तीन ग्रामपंचायतींना यावेळी सन्मानीत करण्यात आले.
तंत्रज्ञान
विभागातील पुरस्कारावरही महाराष्ट्राची मोहर
केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी
तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून योगदान देणा-या विविध राज्यांतील संस्थांचा
यावेळी विविध श्रेणींमध्ये सत्कार करण्यात आला. तंत्रज्ञान विभागातील प्रेरणादायी
पुरस्कारासाठी नवी मुंबईतील रामराव आदिक तंत्रज्ञान संस्थेचा यावेळी गौरव करण्यात
आला. सार्थक लांगडे आणि त्यांच्या चमुने हा पुरस्कार स्वीकारला.
00000
Subscribe to:
Posts (Atom)