महाराष्ट्र राज्य शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, वृत्त, लेख, छायाचित्र आदींची माहिती उपलब्ध करून देणे व याद्वारे ते जनतेपर्यंत पोहोचविणे. राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.
Sunday, July 10, 2022
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा
Tuesday, July 5, 2022
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे जिल्ह्यात आगमन जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले स्वागत
पंढरपूर, दि.05 (उमाका):- श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखीचे स्वागत केले.
नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.२० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन करुन जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी दर्शन घेतले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे उपस्थित होते.
तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी श्री.परीट यांनी भक्तीमय वातावरणात पालखीला निरोप दिला.
यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले पालखीचे सारथ्य
सराटी (ता. इंदापूर) येथून पालखी माळशिरस तालुक्यातील अकलूज हद्दीत आल्यानंतर पालखीचे स्वागत जिल्हा प्रशासनाने केले. पालखीच्या स्वागत ठिकाणापासून अकलूज येथील गांधी चौकापर्यंत पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होते.
अकलूज नगरपरिषदेच्या वतीने पालखीचे स्वागत
अकलूज येथील गांधी चौकात नगरपरिषदेच्यावतीने आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. मुख्याधिकारी तथा प्रशासक दयानंद गोरे यांच्यासह अकलूज परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करुन अश्व रिंगणी धावले. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरला. अश्वाचे रिंगणात धावणे हा क्षण टिपण्यासाठी प्रत्येकजण नजरा एकटक लावून बसला होता. लाखों वारकरी, ग्रामस्थ अश्वाचा नेत्रदीपक सोहळा पाहून तृप्त झाले.
या रिंगण सोहळ्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते, पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर आदी मान्यवर उपस्थित होते.
00000000
Monday, July 4, 2022
माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात हरी नामाच्या गजरात आगमन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाच्या वतीने केले पालखीचे स्वागत
पंढरपूर, दि.04 (उमाका): पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ‘श्री’ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरी नामाच्या गजरात आज सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथील धर्मपुरी बंगला येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास माजी आमदार रामहरी रूपनवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, माळशिरसचे तहसीलदार जगदिश निंबाळकर, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, सरपंच अमोल पाटील आदी उपस्थित होते. तत्पूर्वी माऊलीच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी 11.30च्या सुमारास धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.
चला पंढरीसी जाऊं। रखमुमादेविवरा पाहू॥
डोळे निवतील कान। मना तेथे समाधान ॥
संतां महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी॥
या संत तुकाराम महाराज अभंगाने हरिनामाच्या गजरात पालखीचा जिल्हा प्रवेश झाला. पालखी आगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने कला पथकाव्दारे आरोग्यविषयक विविध योजनांची वारकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. वारीमधील महिला वारकऱ्यांसाठी माफक दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावे म्हणून वेंडर मशीन विसावा ठिकाणी बसविली आहे, त्याप्रमाणेच आरोग्य विभागाने वारीमध्ये प्रथमच स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे तसेच बाळासाहेब चोपदार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आषाढी यात्रा २०२२ या सोलापूर जिल्हा माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व मान्यवर अधिकाऱ्यांनी टाळ हाती धरुन हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर विसाव्यापर्यंत पायी चालले.
कारुंडे येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे रवाना झाली.
पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे, आरोग्य सुविधा, स्वच्छता, सुरक्षा तसेच विद्युत पुरवठा आदी आवश्यक सुविधा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
00000