Thursday, September 29, 2022

...अन् वेदना विसरून विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावर क्षणभर फुललं हसू बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थीनींच्या प्रकृतीची पालकमंत्र्यांकडून विचारपूस

 



पुणे दि.२९: साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थीनींच्या डोक्यावर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा हात मायेने फिरला...घाबरू नको, लवकर बरी हो म्हणत त्यांनी हातातले चॉकलेट विद्यार्थीनीच्या हातात दिले....आणि काही क्षण आपल्या वेदना विसरून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं...शाळेने दिलेले संस्कार न विसरता मुलींनी याही स्थितीत ‘थँक यू’ म्हटलं... जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हे हास्य आणि त्यांचे दोन शब्द सुखावून गेले.....


आंबेगाव तालुक्यात गिरवली येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची श्री.पाटील यांनी आज सकाळी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. जखमी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार करण्याच्या व आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना यावेळी श्री. पाटील यांनी डॉक्टरांना‌ केल्या.


आयुकाची दुर्बिण पाहण्यासाठी गेलेल्या पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेच्या बसचा मंगळवारी  अपघात झाला. दुर्घटनेत  किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारांती पालकांकडे सोपविण्यात आले होते. पाच विद्यार्थी आणि चालकावर भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकमंत्री पाटील यांनी जखमी विद्यार्थीनी आणि चालकाची भेट घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. जखमींवर चांगले उपचार करण्याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार द्यावेत असे त्यांनी सांगितले.


शालेय विद्यार्थ्यांना भेटणार असल्याने पालकमंत्र्यांनी सोबत ‘खाऊ’ देखील नेला होता. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रेमळपणे संवाद साधताना त्यांना धीर दिला आणि सोबत चॉकलेटही दिले. ती आवडीची भेट पाहून क्षणभर त्या विद्यार्थीनीही आपल्या वेदना विसरल्या. पालकमंत्र्यांनी मुलींच्या पालकांशीही चर्चा करून मुले लवकर बरे होतील, त्यांच्यावर चांगले उपचार होतील, चिंता करू नका अशा शब्दात धीर दिला. त्यांची ही भेट जखमी विद्यार्थींनींसाठी सुखद आणि धीर देणारी ठरली. 


यावेळी साईनाथ रुग्णालयाचे संचालक डॉ.सुहास कांबळे, गणेश भेगडे, अमोल थोरात, नामदेव ढाके, सदाशिव खाडे, ताराचंद कराळे आदी उपस्थित होते.

000

Thursday, September 22, 2022

कास पठाराच्या पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ई-बस व बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण

 



मुंबई, दि. २२ : सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून यासाठी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या ४ - ई बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे, सुरक्षा वाढविणे तसेच, घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही करण्यात येईल मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.
मंत्रालयातून मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे, ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मंत्री श्री. लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, सरपंच यांचे आभार मानले. कास पठाराच्या संवर्धनासाठी तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, सहसंचालक धनंजय सावळकर उपस्थित होते तर दूरदृश्यप्रणालीव्दारे सातारा येथून आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पर्यटन विकासासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे, स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेल्या कास पठाराच्या पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिकरित्या कास पठार अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. शासनाने नवीन महाबळेश्वरचे जे धोरण तयार केले आहे, त्यामध्येही कास पठारच्या विकासाला निश्चित वाव देण्यात येईल.
यावेळी आमदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कास पठारावील प्रदुषण रोखण्यासाठी ई-बसची सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा शासनाचा चांगला निर्णय आहे. कास पठारावरील प्रदूषण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत व वन विभागाच्या वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिकच्या सुविधा मिळाव्या तसेच नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करावी, यासाठी नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
कास पठारावरील फुले पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. येथील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ई - बस सेवा सुरु करण्यात येत आहे. ह्या ई - बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षापासून अतिरिक्त ई - बसेसचे नियोजन केले जाईल. तसेच कास संवर्धनासाठी आणखी उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हाधिकारी श्री.जयवंशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
निसर्गरम्य कास पठार
सह्याद्री पर्वतरांगेत सातारा शहरापासून २५ कि.मी. अंतरावरील निसर्गरम्य अशा कास पठारावर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात विविधरंगी फुलांचा बहर सुमारे १० चौरस कि.मी. क्षेत्रावर पाहायला मिळतो. या पठारावर सुमारे ८५० वनस्पतींचे विविध प्रकार आणि फुलपाखरे आढळतात. जून ते ऑक्टोबर या कालावधीत मान्सूनच्या प्रगतीनुसार पठार दर १५ - २० दिवसांनी रंग बदलत असते. अनेक स्थानिक व लुप्त होत चाललेल्या वनस्पती देखील इथे आढळतात. वनस्पतीशास्त्राच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी हा ठेवा उपयोगी ठरेल. मागील काही वर्षांपासून हे कास पठार पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कास पठाराला हंगामात दररोज ३ हजारांहून अधिक पर्यटक भेट देतात.
युनोस्कोने कास पठाराला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. हे स्थळ राखीव वन व जैवविविधतेचे भांडार असल्यामुळे येथील नैसर्गिक वनसंपत्तीचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पर्यटन विभाग पर्यावरणपूरक पर्यटन संकल्पनेअंतर्गत या हंगामा करिता ४ ई- बसेस सुरु करत आहे. या बसेस कासने गावापासून कास पाठरापर्यंत अर्धा कि.मी. पर्यंत चालविण्यात येतील. यामुळे या परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणास आळा बसण्यास मदत होईल.
पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर सौंदर्याने बहरलेला असतो. या परिसरात ठोसेघरचा धबधबा, बामनोली येथे कोयना जलाशय, वासोटा किल्ला, सज्जनगड किल्ला अशी विविध पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन विभागच्या माध्यमातून बामनोली येथे नवीन जलक्रीडा केंद्र उभारण्यासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकंदरीत या संपूर्ण परिसरास एक एकात्मिक टुरिझम सर्कीट विकसित करण्यात येईल आणि त्यातून या परिसरातील स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, तसेच आर्थिक विकासाला चालना दिली जाईल. आगामी काळात अशा अन्य पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुद्धा ई-बसेस सुरु करता येतील. त्या माध्यमातून पर्यटन विकासाबरोबर पर्यावरण रक्षणालाही प्राधान्य देण्यात येईल.
*****

शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा -गिरीष महाजन



पुणे दि.२२:- शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेच्या मानसिकतेतही परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे भारत सरकारचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय व राज्य शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, केंद्रीय पंचायत राज विभागाचे सचिव राजेश कुमार,अतिरिक्त सचिव चंद्रशेखर कुमार,सह सचिव रेखा यादव, राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, यशदाचे उप महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते.
ग्राम विकास मंत्री महाजन म्हणाले, देशात व राज्यात शाश्वत विकासांच्या ध्येयांची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करणे हे महत्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातील पंचायत राज संस्थांचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. ग्राम पंचायतीमध्ये या ध्येयांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाने नऊ संकल्पना निश्चित केल्या असून या संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.
शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यासोबतच देशाच्या विकासात भर घालण्यासाठी गावाला स्वच्छ-सुंदर बनवावे लागेल. यासाठीच पंचायत राज विभागाच्या माध्यमातून सरपंचांना महत्वाचे अधिकारी देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना विकास काम तसेच विविध योजनांची अंमलबजावणीसाठी थेट निधी देण्यात येतो. गावात मुलभूत सुविधांसोबतच गाव स्वच्छ, सुंदर, पाणी, आरोग्य यासह गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. असे ते म्हणाले.
राज्यात राळेगण सिद्धी व हिवरेबाजार या गावांनी ग्राम विकासात केलेले काम समोर ठेवून सरपंचांनी आपले गाव स्वच्छ, सुंदर व जलसमृद्ध करावे, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले.
केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील म्हणाले, शहराप्रमाणे गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. गावाला सुरक्षित व समृद्ध करण्यासोबतच गावांचा शाश्वत विकास करण्यासाठी सरपंचांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. संकल्प, स्वप्न, सामर्थ्य या तीन सूत्रांच्या आधारे सरपंच काम करतात. शाश्वत विकासाचे लक्ष साध्य करण्यासाठी सरपंचासोबतच गावाती प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.
जलजीवन मिशनच्या माध्यमातून 'हर घर नल' संकल्पना पूर्ण करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. पाणी वाचविण्यासाठी गावात विचार होण्याची गरज आहे. स्वच्छ, सुंदर गावासोबत जलसमृद्ध गाव निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच दिशादर्शक ठरेल. राज्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्यशासन एकत्रितपणे सर्वोतोपरी मदत करेल असे त्यांनी सांगितले.
भारत सरकारचे सचिव सुनिल कुमार म्हणाले, देशाला विकासित करण्यात ग्रामीण भारताची भूमिका महत्वाची आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. गाव व शहर हा भेद दूर करण्यासाठी १७ उद्दिष्टांपैकी ९ उद्दिष्ट केंद्रीत करण्यात आली आहेत. असे त्यांनी सांगितले.
राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, पंचायतराज विभागाने शाश्वत विकासासाठी नऊ संकल्पना विकसीत केल्या आहेत. नऊ संकल्पनेला विचार घेत ग्रामपंचायतींना विकासाचे नियोजन करावयाचे आहे. राज्यात राळेगण सिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा ही आदर्श गावे आहेत. लोकसहभाग व शासकीय योजनांची जोड देवून हजारो गावे विकासाच्या प्रक्रियेत पुढे येत आहेत. महाराष्ट्रात ग्राम विकासाच्या दृष्टीने अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वपूर्ण ठरतो आहे. यासाठीच ग्राम विकासाचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जलसमृद्ध गाव, स्वच्छ गाव पुस्तिका तसेच नऊ उद्दिष्टावर आधारीत पोस्टर पुस्तिका व 'ग्राम विकासाचा रोड मॅप' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महा ई ग्राम पोर्टलचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी देशातील विविध राज्यातील सरपंच, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0000

Wednesday, September 14, 2022

'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे उद्‌घाटन



तृतीयपंथीयांच्या प्रश्नाबाबत परिषदेत सकारात्मक चर्चा
पुणे, दि. १४: मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, चित्रा वाघ, झैनब पटेल, श्रीगौरी सावंत, सलमा खान आदी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. तृतीयपंथीयांच्या प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने ही परिषद महत्वाची ठरणार आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, तृतीयपंथीयांच्या बाबत आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या समुदायाचे प्रश्न आपण आपले प्रश्न म्हणून मांडणे गरजेचे आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, लोकशाही प्रक्रियेत दिव्यांग तसेच तृतीयपंथीय यांचा सहभाग वाढावा, यासाठीचा हा प्रयत्न आहे. सुरूवातीच्या कालावधीत सुमारे १३०० तृतीयपंथीय मतदार होते, आता ही संख्या ४ हजारापर्यंत आहे. मतदान प्रक्रियेत या घटकाचा सहभाग वाढयला हवा. तृतीयपंथीयांच्या मूलभूत प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी सर्व विभागांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मानसीक बदल आणि संवादाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना समजून घेण्याच्या प्रक्रीयेद्वारे त्यांना मुख्य प्रवाहात घेणे अधिक सोपे जाईल. पोलीस विभागाकडून तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. सोनावणे म्हणाले, निसर्गामध्ये एकरूपता पहायला मिळते. मानवी जीवनात भेद निर्माण झालेले दिसतात. असे प्रश्न सोडविण्यासाठी अशा परिषदेच्या माध्यमातून विचारमंथन होणे महत्वाचे आहे.
झैनब पटेल म्हणाल्या, राज्यात ४ हजारावर तृतीयपंथीय मतदार आहेत, ही संख्या वाढायला हवी. यासाठी तृतीयपंथीय समूदाय सर्वतोपरी सहकार्य करेल.
यावेळी श्रीगौरी सावंत, सलमा खान यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
000

Wednesday, September 7, 2022

आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणे दि. ७ : रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३१ व्या जयंती सोहळा कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार चंद्रकांत बावनकुळे, गोपीचंद पडळकर, संजय जगताप, जयकुमार गोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे, उपाध्यक्ष अंकुश जाधव आदी उपस्थित होते.
आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, स्वराज्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याकरीता ज्यांनी बलिदान दिले त्या नाम- अनाम वीरांचे स्मरण होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्य काय असते ते दाखवून दिले. महाराजांचे किल्ले म्हणजे स्वराज्याची संपत्ती होती. त्यांच्यामागे अठरा पगड जातीचे मावळे होते.
शिवाजी महाराजांनंतर इतिहासात इंग्रजांविरुद्ध प्रथम आवाज उठवणारे राजे उमाजी नाईक होते. ते खरे आद्यक्रांतिकारक नव्या स्वराज्याचे राजे होते. स्वराज्याची ज्योत पेटविण्याचे काम उमाजी नाईक यांनी केले. ब्रिटिशांच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून उठाव घडवून आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. राज्यकारभार करतांना त्यांनी सनद निर्माण केली. त्या सनदीतून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. ब्रिटिशांना सळो की पळो करणाऱ्या राजे उमाजींना देहदंडाला सामोरे जावे लागले.
*महामंडळासाठी १०० कोटी, स्मारकासाठी ५ कोटी देणार*
रामोशी आणि इतर भटक्या विमुक्त जातीच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. त्यासाठी १०० कोटी रुपयांची व राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. रामोशी आणि इतर भटक्या व विमुक्त जाती मधील नागरिकांना यापुढे जातीच्या दाखल्यासाठी अडचणी येणार नाहीत यासाठी जातीच्या दाखल्यासंदर्भातील प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. या समाजाच्या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी आमदार श्री. पडळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जय मल्हार क्रांती संघटनेचे चंद्रकांत खोमणे, रमण खोमणे, तानाजी खोमणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
0000

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण शिक्षकांनी शिक्षणदानाचे काम व्यवसाय म्हणून न करता ध्येय म्हणून करावे -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


पुणे,दि.७:- शिक्षकांनी स्वीकारलेले काम व्यावसायिक भावनेतून न करता एक उदात्त ध्येय म्हणून सेवाभावनेने करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण प्रसंगी मंत्री ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनंदा वाखारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, ब्रिटिशांनी त्यांना सोयीस्कर पद्धतीने शिक्षणपद्धतीची रचना केली होती. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा मूळ गाभा पुन्हा एकदा देशातल्या नागरिकांमध्ये बिंबविण्याचा प्रयत्न आहे. लहान वयात झालेले संस्कार घेऊनच मुले पुढे जात असतात. पूर्वी गुरुकुलमध्ये विद्यार्थी अनेक विषयात पारंगत होत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार राबवण्यात येणाऱ्या शिक्षणपद्धतीमुळे आजचे आपले विद्यार्थीदेखील अनेक विषयात पारंगत होतील
नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणातील टप्पे बदलण्यात येणार आहेत. शासन शिक्षणावर मोठा खर्च करते. ही बाब लक्षात घेऊन शिक्षकांनी मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासह संस्कारीत होतील यासाठी परिश्रम घ्यावेत.
वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी स्वतःला वेळेत बांधून न घेता अधिक वेळ काम करण्याची गरज आहे. शैक्षणिक विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्वच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. शासन सर्व ते सहकार्य करेल. हा निधी शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह, क्रीडा विषयक सुविधा, ई-लर्निंग, शाळेसाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी वापरण्यात यावा, असे श्री.पाटील यांनी सांगितले.
यावेळी मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व केंद्रप्रमुख यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्ह्यातील गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.
00000