Friday, December 8, 2017

प्राचीन आणि अधुनिक विज्ञानाची सांगड घालून शास्त्रज्ञांनी समन्वयाचा पूल उभारावा - राज्यपाल चे . विद्यासागर राव


राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या 87 व्या वार्षिक सत्राचे थाटात उद्घाटन
पुणे दि.8 : राष्ट्रीय विज्ञान अकादमी ही भारतातील अनेक वर्षांची उज्ज्वल परंपरा असणारी सर्वात मोठी विज्ञान संस्था आहे, देशातील विज्ञानाला लोकप्रिय करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी या संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. लोकांच्या जीवनातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी संशोधन करण्याबरोबरच अधुनिक विज्ञान आणि पारंपारिक भारतीय विज्ञान यांच्यात सांगड घालून समन्वयाचा पूल निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या शास्त्रज्ञांनी करण्याचे अवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले.
येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चंद्रशेखर सभागृहात राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या (एनएएसआय) 87 व्या वार्षिक सत्रानिमित्त बेसिक रिसर्च:इटस् रोल अन नेशन डेव्हलपमेंट या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक सत्राचे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, इस्त्रोचे चेअरमन डॉ. किरण कुमार, पद्मविभूषण डॉ. मंजू शर्मा, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा. दिलीप ढवळे, एनएसआयच्या सचिव डॉ. वीणा टंडन आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, भारतीय विज्ञानाला मोठी परंपरा आहे. एकेकाळी भारतीय विज्ञान सर्वात अग्रेसर होते. मात्र परदेशी वर्चस्वामुळे भारतीय विज्ञानाला झाकोळून टाकले आहे. प्राध्यापक एम.जे.के. मेनन, प्राध्यापक एम.एस. स्वामीनाथन आणि आता डॉ. अनिल काकोडकर यासारख्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय विज्ञान अकादमीने भरीव काम केले आहे. त्यामुळे भारत विज्ञान क्षेत्रातील आपले पूर्वीचे अव्वल स्थान पुन्हा प्राप्त करेल. विज्ञानाच्या मदतीनेच भारत गरिबी, उपासमार, अज्ञान, रोगराई, स्वच्छता, कुपोषण, पाणी आणि ऊर्जा सुरक्षा यासारख्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. गेल्या काही दशकांत भारताने माहिती तंत्रज्ञान, स्पेस सायन्स, न्यूक्लियर सायन्स, फार्मास्युटिकल्स, मेडिसीन आणि इतर क्षेत्रात क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे.
देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याचे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, गणित आणि‍ विज्ञानाकडे विद्यार्थ्यांचा ओढा निर्माण व्हावा यासाठी शालेयस्तरापासून विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्याच बरोबर शालेय स्तरापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत अधिक चांगले विज्ञान शिक्षक तयार करण्याची आवश्यकता आहे. मुलांना विज्ञान विषय अधिक रंजक प्रकारे शिकविण्यासाठी विज्ञानाच्या शिक्षकांना प्रशिक्षीत करण्याची आवश्यकता आहे. विज्ञान क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्थांनी यासाठी विशेष प्रयत्न करून शिक्षण संस्था आणि सामान्य जनता यांच्याबरोबर चांगला संवाद सुरु करावा. शिक्षण संस्था आणि संशोधन संस्थांना केंद्रस्थानी ठेवून आपण काम करण्याची आवश्यकता आहे. अनेक देशात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विज्ञान महोत्सव सुरू असतात, त्याच धर्तीवर आपल्या राज्यात विज्ञान संस्था आणि प्रत्येक विद्यापीठांच्या विज्ञान विभागात दरवर्षी विज्ञान महोत्सवाचे आयोजन करावे. 
            डिजीटल क्रांतीमुळे देशात माध्यमांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी माध्यमांनीही आपले योगदान द्यावे. त्यासाठी विविध विज्ञान विषयक कार्यक्रमांना माध्यमांनी प्रसिध्दी द्यावी. गेल्या काही दिवसात भारत सरकारने संशोधन आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय, धोरणात्मक निर्णय घेवून काम सुरु केले आहे. नाविन्याला आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने स्टार्टअप इंडिया कार्यक्रम सुरू केला आहे. यामुळे देशात चांगले वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
            डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, भारत हा वेगाने विकसीत होणारा देश आहे. देशाच्या विकासाच्या या प्रक्रीयेत विज्ञानाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सामान्य लोकांच्या जीवनात अधिक सुखकर परिवर्तन होण्यासाठी विज्ञान संस्था प्रयत्नशील असतात. अशा संस्थांना आणि वैज्ञानिकांना प्रोत्साहन, मार्गदशर्न करण्याचे करण्याचे काम राष्ट्रीय विज्ञान अकादमी करत आहे. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी हा परिसंवाद उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या डॉ. अनिल कुमार, देबाशीष चटोपाध्याय, इन्साद अली खान या शास्त्रज्ञांचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या वार्षिकीचे प्रकाशन करण्यात आले.
            यावेळी दलीप ढवळे, मंजू शर्मा, किरण कुमार यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन करमळकर यांनी केले. तर आभार डॉ. वीणा टंडन यांनी मानले. या कार्यक्रमाला देशातील विविध राज्यातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******

















  

No comments:

Post a Comment