Tuesday, February 19, 2019

बांधकाम कामगारांना हक्काचे घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा : अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा शुभारंभ













पुणे दि. 19-  राज्यातील 25 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करुन सर्वांना 2022 पर्यंत हक्काचे घर देणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अटल बांधकाम कामगार आवास.योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
            येथील शेती महाविद्यालयातच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय पाटील, आमदार बाळा भेगडे, बाबूराव पाचर्णे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, पिंपरी चिंचवड चे महापौर राहुल जाधव, बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार मीना, रेराचे अध्यक्ष गौतमकुमार चटर्जी आदी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बांधकाम कामगार देश आणि राज्य निर्माण करण्यात आघाडीवर आहेत. मात्र या कामगारांची आजपर्यंत दखल घेतली गेली नाही. आमचे सरकार बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असेल.
            अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या माध्यमातून कामगारांना  हक्काचे घर देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. राज्य शासन पंचवीस लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करणार असून पाच वर्षात सर्वांना घरे देण्यासाठी कटीबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
            कामगारांच्या हितासाठी राज्यात साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम कामगारांच्या घरांसाठी निधीची कमी पडू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
             कामगारांना मध्यान्ह भोजन, आरोग्य आणि प्रशिक्षण देण्याच्या योजना आखण्यात आली आहे.बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
            कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या मनोगतात कामगारांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रधान सचिव राजेशकुमार मिना यांनी प्रास्ताविक केले. कामगार आयुक्त राजीव जाधव.यांनी आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले.


अडीच लाखाची शिष्यवृत्ती मिळाल्याने पी एच डी झालो
        कामगारांच्या मुलाला संशोधनासाठी अडीच लाखाची शिष्यवृत्ती उपलब्ध करुन दिल्यामुळे मी पी.एच.डी करु शकलो. वंचित व गरीब मुलांसाठी अनेक योजना आहेत. कोणत्याही घटकातील मुलगा उच्च शिक्षण घेऊ शकतो, मात्र त्यासाठी शासनाचे पाठबळ हवे असते. मला शिष्यवृत्ती मिळाली नसती तर मी संशोधन करु शकलो नसतो असे सोलापूरच्या अनिल झेंडेने यावेळी सांगितले.
            कामगार विभागाने माझ्या गुणवत्तेची कदर करुन मला शिष्यवृत्ती दिली, त्याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली.


*****

No comments:

Post a Comment