Friday, May 19, 2017

इतर गावांनी आदर्श घ्यावा असे झाले आहे धामणेरचे काम ---- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



इतर गावांनी आदर्श घ्यावा 
असे झाले आहे धामणेरचे काम
                                   ----  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

                सातारा दि. 19 (जि.मा.का.) :  राज्यातील कुठल्याही गावांनी मला जर विचारले तर मी म्हणेल आदर्श गाव पाहण्यासठी  धामणेरला जा. राज्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा असे पथदर्शी काम या गावाने केले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो,  असे कौतुक  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
                कोरेगाव तालुक्यातील धामणेर येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची पाहणी केली. यावेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आ. बाळासाहेब पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे आदी उपस्थित होते.
                मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी करुन कम्युनिटी बायोगॅस प्रकल्पाचीही पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना  माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले,धामणेरच्या ग्रामस्थांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. ते पाहण्यासाठी मी आज आलो आहे. खरं तरं मीच गावाचे अभिनंदन आणि आभार मानायला हवेत,असे भावोद्गार काढून, त्यांनी ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. आपली गावं आपण कशी चांगली करु शकतो, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणले धामणेर आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गावाने गरिबातल्या गरिबाचाही विचार केला आहे. 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे ही प्रधानमंत्री यांची संकल्पना इथे साकार होत आहे. जिल्ह्यातील 7 हजार घरे आम्ही बांधायला घेतली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी या दोघांचेही मी अभिनंदन करतो. पंडित दिनदयाल उपाध्याय योजना घरकुलांसाठी आणली आहे.  त्यामधून 50 लाखाचे अनुदानही दिले जाते. शासनाची योजना उत्तमपणे यशस्वी केवळ ग्रामस्थांच्या पाठबळावरच होत असते, धामणेरकरांनी आपल्या कामाच्या माध्यमातून राज्यातील इतर गांवांना आदर्श घालून दिला आहे.
                राज्यातल्या उत्तमातील उत्तम गाव ठरणाऱ्या धामणेरकरांनी अन्य गावांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. मी निश्चितपणे केंद्र शासनाला विनंती करुन हे प्रशिक्षण केंद्र धामणेरमध्ये होण्यासाठी मी प्रयत्न करेन. गावाच्या पाठीमागे निश्चितपणे शासन उभं राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शेवटी दिली.
                यावेळी सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी गावातील केलेल्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, चंद्रशेखर जगताप, आनंद भंडारी, प्रांतांधिकारी हिम्मत खराडे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम पावसकर, अतुल भोसले, साताराचे नगरसेवक धनंजय जांभळे, आनंदराव कणसे, निवृत्त भारतीय कर अधिकारी अनिल पवार आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुढ्या उभारुन मुख्यमंत्र्यांचे स्वागत
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी धामणेर ग्रामस्थांनी सर्व घरांवर गुढ्या उभ्या केल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करुन त्यांचे आपल्या गावात स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद
प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरकुल मिळालेल्या लाभार्थी  शालिनी पवार यांच्याशी अगदी आस्थेवाईक विचारपूस करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संवाद साधला. शौचालयाचा नियमीत वापर करा. परिसर स्वच्छ ठेवा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पुरस्कार प्राप्त धामणेर
जिल्हा स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार सन 2016-17.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार सन 2016-17
संत गाडगेबाब ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2001-02
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन  2003-04
संत ग्राडगेबाबा ग्राम स्वच्छताअभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2004-05
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा विभागस्तरावर द्वितीय  पुरस्कार सन 2004-05
माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2005 रोजी निर्मल ग्राम पुरस्कार.
जिल्हास्तरीय अस्पृश्यता निर्मुलन प्रथम पुरस्कार सन 2002
यशवंत पंचायत राज अभियान विभागस्तर प्रथम पुरस्कार सन 2004-05
विभागीयस्तर वसंतराव नाईक पाणी व्यवस्थापन प्रथम पुरस्कार सन 2003-04
शाहु फुले आंबेडकर दलित वस्ती सुधार अभियानात जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार सन 2006-07
राज्यस्तरीय वनश्री प्रथम क्रमांक सन 2006-07

                                                                                                                00000
राष्ट्र कार्य करणऱ्या पवारवाडीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
                                                                  
          सातारा दि. 19 (जि.मा.का.) :  पवारवाडीकरांनी आपल्या श्रमदानामधून राज्य दुष्काळमुक्त करुन जलयुक्त बनविण्यासाठी अतिशय चांगलं काम केलं आहे. या त्यांच्या राष्ट्र कार्याला, समाज कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारवाडी ग्रामस्थांचे कौतुक केले.
                कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथे गामस्थांनी केलेल्या श्रमदानातून  विविध जलसंधारणाच्या कामांची पाहणी मुख्यमंत्री        श्री. फडणवीस यांनी आज केली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आ. बाळासाहेब पाटील, मुख्यमंत्र्यांची प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील आदी उपस्थित होते.
                ग्रामस्थांचे  अभिनंदन करुन मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, अतिशय चांगलं काम पवारवाडी ग्रामस्थांनी केलेले आहे. दुष्काळावर जर मात करायची असेल तर ते श्रमदानातून करण्यात येते,  हे त्यांनी दाखवून दिले आहे. पावसाचा थेंब न् थेंब आपल्या गावचा आपल्या मालकीचा आहे. तो गावातच थांबला पाहिजे आणि मुरला पाहिजे. माथा ते पायथा विविध उपचार करुन आपण पाणी आडवतो त्याबरोबरच मातीही अडविली पाहिजे. या कामामुळे माती थांबते. त्यातून पाणी भूगर्भात जाते आणि गाव जलयुक्त होते. पवारवाडी ग्रामस्थ वॉटर कप स्पर्धेसाठी दावेदार आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.
                यावेळी इंधनाबाबतचा 1 लाख 93 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  सरपंच राजेंद्र पवार यांना दिला.  यावेळी वन विाभागाच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
                याप्रसंगी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, रहिमतपूरचे नगरसेवक सुनील माने, साताराचे नगरसेवक धनंजय जांभळे,  आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियान श्रमदानातून केलेली कामे
डीप सीसीटी 17 हजार मीटर
दगड बांध 2 हजार 700 मीटर
वृक्ष लागवड संख्या 903
लहान माती बांध संख्या 6
सी सी टी  1 हजार 267 मीटर
एल बी एस ( अनघड दगड बांध) 135
विहीर पुनर्भरण  15
ठिबक सिंचन 126 हेक्टर
यांत्रिक कामे
गाळ काढणे  15 हजार घन मीटर
ओढा रुंदीकरण 15 हजार 400 घन मीटर
मोठा माती बांध  5
नाविन्य उपक्रम
जाळी बंधारा 2
टायर बंधारा 1
शोष खड्डा 190

वन विभागाचे एक्सलंट काम
वन विभागाच्यावतीने  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी वृक्षारोपण केले. गतवर्षी लावण्यात आलेल्या वृक्षारोपणाची पाहणी करुन वन विभागाचे एक्सलंट काम आहे असे गौरवोद्गार काढून उप वनसंरक्षक अनिल अंजनकर यांचे त्यांनी अभिनंदन केले.

                                                                                0000000









No comments:

Post a Comment