Saturday, November 24, 2018









व्यापार - उद्योग वाढीत लाडशाखीय वाणी समाजाचे मोठे योगदान
-मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस
                                   -अखिल भारतीय महाआधिवेशनाचे थाटात उद्घाटन
                 - विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी जागा देणार
                 - ८० हजाराहून अधिक सभासदांची नोंदणी
                   - उद्योजकता मार्गदर्शन प्रदर्शनाचे २०० दालने

            पुणे  दि. 24-  देशाच्या व्यापार व उद्योग वाढीत लाडशाखीय वाणी समाजाचे मोठे योगदान आहे. हा समाज आता शिक्षणातही पुढे येत  आहे. पुणे शहर शिक्षणाचे माहेर घर असल्याने अनेक विद्यार्थी येथे येतात. या विद्यार्थांच्या निवासाची सोय होण्यासाठी 500 खोल्यांचे वसतिगृह बांधण्याचा मानस या समाजाचा आहे. त्यासाठी  पुणे व नाशिक शहरात जमीन उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
                        अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते .
    यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, स्वागताध्यक्ष आर.एल.वाणी,  कार्याध्यक्ष कैलाश वाणी आदी उपस्थित होते.
            आधिवेशनासाठी देशभरातून आलेल्या लोकांना शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, इतिहासात लाडशाखीय वाणी समाजाने प्रत्येक आक्रमणाचा समर्थपणे सामना केला आहे. जेव्हा देशाला गरज पडली तेव्हा  या समाजाने बलिदानही  दिले  आहे. या समाजाला  मोठा इतिहास आहे. देशातील व्यापार आणि उद्योगाची समृद्धी वाढविण्यामध्ये वाणी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे.
     मुख्यमंत्री श्री. फडणवीस  पुढे म्हणाले,  यशस्वी समाजामध्ये सरासरी 2 ते 3 टक्के लोक वाणी समाजाचे आहेत. लाडशाखीय वाणी समाज हा कर्मयोगी आहे.
       या कर्यक्रमात अनावरण झालेल्या लाडशाखीय वाणी  समाजाच्या चेंबर ऑफ कॉमर्सचा दर्जा जागतिक पातळीवरचा होईल, अशा शुभेच्छा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समाजाची माहिती देणाऱ्या समाजमंथन’’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्याध्यक्ष कैलाश वाणी यांनी या समाजाचा इतिहास सांगताना हा समाज विविध क्षेत्रात करीत असलेल्या प्रगतीची माहिती दिली. सध्या विविध क्षेत्रात समाजाचे असणारे प्रतिनिधित्वा बाबत देखील  लक्ष वेधले. समाजाकडून 20 ते 25 दुष्काळग्रस्त गावांना अन्न, वस्त्र, निवारा पुरवणार असल्याचेही  श्री. वाणी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधी साठी 11 लाख
 यावेळी लाडशाखीय वाणी समाजाकडून मुख्यमंत्री सहायता निधीस अकरा लाख रुपयांचा धनादेश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  सुपूर्द करण्यात आला.
दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना देखील वाणी समाज दत्तक घेत असून या विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक सन्मान यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
००००

No comments:

Post a Comment