औरंगाबाद येथे पोलीसांसाठी सुसज्ज टाऊनशिप उभारणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद, दि. 2 : मुंबई, पुणे आणि नागपूर शहराच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सर्व सोई, सुविधांनीयुक्त अशी स्मार्ट टाऊनशिप आगामी काळात उभारण्यात येईल. या टाऊनशिप मध्ये व्यायमशाळा व कौशल्य विकास केंद्राचा समावेश केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
येथील पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित पोलीस आयुक्तलयाची प्रशासकीय इमारत व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांचे भूमिपूजन, कोनशिलेचे अनावरण तसेच 200 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, महापौर भगवान घडामोडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर,राज्य वक्फ बोर्डचे अध्यक्ष एम. एम. शेख, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सर्वश्री संजय शिरसाट, अतुल सावे,इम्तीयाज जलील, प्रशांत बंब, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस महासंचालक ( गृहनिर्माण) व्ही.डी. मिश्रा, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नवीनचंद्र रेड्डी, अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस दलातील कर्मचारी शिवकालीन जुन्या घरांमध्ये राहत आहेत. ही खंत मनात असल्यामुळे त्याच्यासाठी नवीन घराच्या बांधकामासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. ही एक चांगल्या प्रकारची सुरुवात असून पोलीसांच्या परिवाराला उत्तम व्यवस्थेत राहता आले पाहिजे यासाठी औरंगाबाद शहरामध्ये नवीन 532इमारतींच्या माध्यमातून पोलीसांसाठी परिपूर्ण वसाहत उभारण्यात येत आहे. राज्यात पोलीस दलासाठी आठ ते दहा हजार कोटींच्या विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून पोलीस दलाच्या पाठीशी राज्य शासन उभे आहे. पोलीसांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात पोलिसांसाठी हाऊसिंग स्टॉक निर्माण करण्यासाठी 51 हजार घरांचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात पोलीसांच्या घरांसाठी राज्य शासनाने उत्तम काम केले. एवढेच नव्हे तर गेल्या पंधरा वर्षापेक्षा दुपटीने काम केले आहे. पोलीसांना पुर्वी खुराड्यासारखी घरे देऊन समाधान व्यक्त केले जात असे परंतु आता आम्ही जी घरे मुंबईत पोलीसांसाठी बांधली त्या घराची मागणी पोलीस अधिकारीही करु लागले आहेत. या घरांचे काम उत्तम झाले आहे. मुंबईतील घाटकोपर येथे पोलिसांसाठी आठ हजार घरांची स्मार्ट टाऊनशिप तयार करण्यात येत आहे. अशी टाऊनशिप पुणे, नागपूर आणि आता औरंगाबादमध्ये करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे, त्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. पोलीस वसाहतीच्या विकासासाठी पीपीटीचा प्रयोग करता येईल का यांचा विचार करावा. या टाऊनशिपमध्ये तसेच प्रत्येक पोलीस वसाहतीत एक सुसज्ज व्यायाम शाळा आणि कौशल्य विकास केंद्रांची सुविधा करण्यात येईल. त्यामुळे पोलीस आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य चांगले राहण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांना कौशल्याचे शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करता येईल, असेही ते म्हणाले.
औरंगाबाद शहराला आपण स्मार्ट शहर करतोय, त्यामुळे शहरातील पोलीसही स्मार्ट झाले पाहिजेत. शहरात माहिती व तंत्रज्ञानाच्या सुविधा येत आहे. आयटी पार्कचा विस्तार होणार आहे. त्यामुळे शहरात सी.सी.टी.व्ही द्वारे सर्व्हिलन्स झाले पाहिजे, त्यादृष्टीने काम करुन त्याचा नियत्रंण कक्ष पोलीस आयुक्तालयात करण्यात यावा, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील पोलीस राष्ट्रीय आणि आता आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही अग्रेसर झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर यश मिळवत आहेत. अशा पोलीसांना क्रीडा विषयक सुविधा पुरविण्यासाठी निधीची मागणी पोलीस महासंचालक श्री. माथूर यांनी केली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
पोलीसांना निवृत्तीनंतर वाढत्या किमंतीमुळे आरोग्याच्या सेवा परवडत नाहीत. त्यामुळे एएसआयच्या धरतीवर पोलीसांना महात्मा जोतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेचा लाभ देण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शहरात आयुष्यभर काम केल्यानंतर पोलीसांचे कुटुंब खेड्यात जाण्यास तयार होत नाही, त्यामुळे निवृत्तीनंतरही त्यांना शहरात घर मिळावे यासाठी योजना आखण्यात येत आहेत. औरंगाबाद शहरातील पोलीसांसाठीही अशा योजनेचा प्रस्ताव तयार करावा, त्यासाठी आवश्यक असेल तर सरकारी किंवा खाजगी जमीन देवून पोलीसांच्या निवृत्तीनंतरच्या घराचे स्वप्न साकार करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या मागणीचा धागा पकडून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र केसरी किताब तीन वेळा पटकावलेल्या पैलवान विजय चौधरी यांना शासकीय सेवेत घेण्याचा निर्णय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उच्चस्तरीय समितीने घेतला आहे. तांत्रिक पूर्तता करण्याचे काम चालू आहे. कारण त्यांना वर्ग एकचे पद द्यावयाचे आहे. राज्यातील इतरही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा योग्य सन्मान करण्यात येत आहे. त्यांनाही उपलब्धतेप्रमाणे नौकऱ्या देण्यात येत आहेत. अशी माहितीही श्री. फडणवीस यांनी दिली.
विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यावेळी म्हणाले की, पोलीस दलाच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पोलीस दलाचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. शहरातील क्रांती चौक येथील पोलीस चौकीसाठी सुध्दा नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे. ते काम सुध्दा पुढील काळात करण्यात येईल. तसेच शहरातील विविध विभागाची कार्यालये खासगी जागेत आहे. ती कार्यालये सरकारी जागेत स्थलांतरीत करण्यासाठी शहरात प्रशासकीय इमारत असली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस महासंचालक (गृह निर्माण) यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे यांनी आभार व्यक्त केले.
००००
No comments:
Post a Comment