Tuesday, June 9, 2020

भामा आसखेड जलवाहिनीचे कामकाज व प्रकल्प ग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेणार- जिल्हाधिकारी नवल किशोर राम



*प्रकल्प ग्रस्तांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध*


 *भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांशी संवाद साधून जाणून घेतल्या अडीअडचणी*

*शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून काम करण्यासाठी प्रशासन तत्पर*

*खेड तहसीलदार कार्यालयाला भेट व कामकाजाचा आढावा*

पुणे,दि.९: भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. जलवाहिनीचे कामकाज, प्रकल्प ग्रस्तांना जमीन वाटप, जमीनीचा मोबदला वाटप आदी प्रश्नांबाबत स्थानिक परिस्थिती पाहून व संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतला जाईल, तसेच पुढील आठवड्यात पुन्हा प्रकल्प ग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. प्रकल्प ग्रस्तांना रोख रक्कम वाटप करताना गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

   जिल्हाधिकारी श्री. राम यांनी आज भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तत्पूर्वी खेड तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन येथील कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला. यावेळी खेड उपविभागीय अधिकारी संजय तेली, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, पोलीस उपअधीक्षक गजानन टोणपे, तहसीलदार सुचित्रा आमले-पाटील, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व प्रकल्प ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
 
  प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना जमीन व मोबदला मिळवून देण्यात गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी. तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.

भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. खेड तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांच्या जमीन वाटपा बाबतचे व रोख रक्कम वाटपाचे कामकाज खेड उपविभागीय कार्यालयाकडे वर्ग करण्यात येईल, असेही श्री. राम यांनी सांगितले. 


  यावेळी भामा आसखेड प्रकरणाचा आढावा घेऊन प्रकल्प ग्रस्तांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे हित पाहून काम करा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, भामा आसखेड  प्रकल्पग्रस्तांना न्यायालयाच्या आदेशानुसार व शासनाच्या मान्यतेनुसार जमीन वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला लवकर मिळवून द्यावा. शेतकऱ्यांना रक्कम वाटप करताना गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच भूमीहीन शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. राम यांनी केल्या.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी 68 धरणग्रस्तांना जमिनीचे एकाच दिवसात वाटप केले, याबाबत जिल्हाधिकारी श्री राम यांना यावेळी प्रकल्प ग्रस्तांनी धन्यवाद दिले. यापुढेही प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी विनंती उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

     000000

No comments:

Post a Comment