Tuesday, June 9, 2020

स्वयंशिस्त व समाज घटकांशी समन्वय ठेवून खेड तालुका कोरोनामुक्त करुया- जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन

*खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनासाठी समिती गठीत करा*

*निसर्ग चक्रीवादळ नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करा*
पुणे दि. 9 :  पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोठे औद्योगिक क्षेत्र विस्तारले आहे. उद्योग धंद्यांवर परिणाम होवू नये, यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, त्याचबरोबर समाजघटकांशी चांगला समन्वय ठेवून खेड तालुका कोरोना मुक्त करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज खेड पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात महसूल, आरोग्य, व संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले-पाटील आदी उपस्थित होते.

  जिल्हा प्रशासन व इतर सर्व समन्वयीन यंत्रणा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करीत आहेत. नागरिकांनीही सोशल डिस्टनसिंग, स्वच्छता विषयक खबरदारी घेऊन स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन कोरोनाच्या संकटावर मात करुया, असे श्री. राम म्हणाले. 

जिल्हाधिकारी राम यांनी खेड तालुका परिसरातील कोरोनाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये एकूण रुग्णांची संख्या, बरे झालेले रुग्ण, तालुक्यात रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना, बाहेरील जिल्हयातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण करण्यासंदर्भांत सुरु असलेली कार्यवाही, ज्येष्ठ नागरिक व कोमोर्बीडिटी रुग्णांसाठी आरोग्य तपासणी, कोविड व नॉन कोविड रुग्णांवरील उपचारासाठी नियोजन, मास्कचा व सॅनीटायझरचा वापर तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.
 
 रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, खेड परिसरात कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना सोबतच स्वयंशिस्त महत्वाची आहे. विलगीकरण प्रक्रीया काटेकोर राबवा.  मास्क, सॅनीटायझरचा वापर, सोशल डिस्टनसिंग आदींचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी केले.

     निसर्ग चक्रीवादळामुळे खेड तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी घेतली. मा. मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने करण्याच्या सूचना दिल्या असून ते वेळोवेळी आढावा घेत असल्याचे श्री. राम यांनी सांगितले.  खंडित वीज पुरवठा, पाणी पुरवठा तात्काळ सुरु करुन द्यावा, अशा सूचना करुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन घेवून संबंधितांना मदत मिळवून द्यावी, असे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

 यावेळी श्री. राम यांनी खरीप हंगामातील कामांचाही आढावा घेतला. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे उपलब्ध करुन देण्यात आली, याचा आढावा घेऊन उर्वरित शेतकऱ्यांना वेळेत खते व बियाणे उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

000000

No comments:

Post a Comment