वीज पुरवठा लवकरात लवकर करण्याचे निर्देश
पुणे, दि. ०६ : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी 'निसर्ग' चक्रीवादळामुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील, मुळशी तालुक्यातील भांबार्डे गावचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.
'निसर्ग' चक्रीवादळचा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात सर्वाधिक फटका बसला. चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये घर, झाडे, विजेच्या पोलचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील पश्चिम पट्टा सध्या अंधारात आहे. अनेक शेतकऱ्यांची खाचरे पाण्याने तुडूंब भरल्याने भाताच्या दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढवले आहे.
भांबर्डे गावातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर श्री. अस्लम शेख म्हणाले की, चक्रीवादळामुळे लोकांच्या घरांवरील पत्रे व छप्पर उडून गेले आहेत. लवकरात - लवकर घरांवर पत्रे व छप्पर बसवण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत केरोसिनचा पुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनास करण्यात आलेल्या आहेत. तसेच लोकांना जेवणाच्या साहित्याचा देखील पुरवठा करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे विजेच्या खांबांचेही फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी येथील प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे.
यावेळी मुळशी तालुक्याचे तहसिलदार श्री. अभय चव्हाण, विभागीय उपायुक्त मत्स्यव्यवसाय श्री. देशपांडे, भांबर्डे गावचे सरपंच, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी , तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment