Monday, July 6, 2020

सातारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली तर उत्तम समन्वयाने परिस्थिती हाताळा-पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा, दि. 6 (जिमाका) :  मागील वर्षीच्या पुरपरिस्थितीत  सातारा तसेच सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते, जीवित हानीही झाली होती. या वर्षीमात्र कोणत्या धरणातून किती विसर्ग केला जाणार आहे, याची पूर्व कल्पना विविध माध्यमातून पुराचा प्रादुर्भाव होणाऱ्या सातारासह, सांगली जिल्ह्यातील यंत्रणा, लोक प्रतिनिधी तसेच  गाव पातळी पर्यंत  देण्यासाठी उत्तम समन्वय असलेली सक्षम यंत्रणा उभी करावी अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
      आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कोरोना व धरणातील पाणीसाठा,  पूर परिस्थिती नियोजनाबाबत बैठक पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे,  सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता श्री मिसाळ  लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
  पुर रेषेच्या आत ज्यांची घरे आहेत, त्यांना पुन्हा नोटीसा द्या, संभाव्य धोक्याची माहिती देवून त्यांचे स्थलांतर करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, पाटण तालुक्यातील 6 गावे व कराड तालुक्यातील 9 गावे पुराच्या प्रादुर्भावात मोडतात  या गावांना आत्तापासूनच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. तसेच वीर धरण भरल्यानंतर नीरादेवघर आणि भाटघर धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवा आणि त्या प्रमाणे जनतेला अलर्ट करा. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्या पुलावरुन वाहतूक व पायी जणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोडकळीस आलेल्या  किंवा जुन्या घरात जे नागरिक राहतात त्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या
*पूर परिस्थितीच्या काळात नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये*
आपत्तीच्या कालावधीत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाने अफवा पसरणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. तसेच धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना अलर्ट करावे, नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. पुर व पावसामुळे  संभाव्य आपत्ती  झाल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला 1077 या टोल फ्री क्रमांकावर  त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
*नियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्ण*
भीमा खोऱ्यात येणाऱ्या आणि कृष्णा खोऱ्यात येणाऱ्या सर्व धरणासाठी पूर नियंत्रण अधिकारी नियुक्त केले असून या सर्वांबरोबर  उत्तम समन्वय  ठेवून काम करा, जेणे करून वेळच्या वेळी पाण्याचा विसर्ग होईल आणि लोकांना कोणताही त्रास होणार नाही. यासाठी 24 तास दक्ष राहा अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.
*कोरोना संसर्गामुळे अधिक बाधीत झालेल्या गावांमध्ये कॅम्प लावून तपासणी करावी*
कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील जी गावे अधिक बाधीत झाली आहेत, अशा गावांमध्ये आरोग्य विभागाने कॅम्प लावून गावातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. मोटार सायकलवरुन डबलसीट जात असले तर अशांवर कारवाई करावी. तसेच मास्क न लावता बाहेर फिरत असतील तर अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी शेवटी केल्या.
कारोना झालेल्या बाधितावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जवळपास सर्वांना आता उपचार घेता येणार आहे. तसेच लक्षणे असलेल्या व लक्षणे विरहित रुग्णांची विहित केलेल्या दिवसाला 6 मिनिटांची वॉक टेस्ट घ्यावी त्यामुळे त्यांची शारिरीक क्षमता लक्षात येईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत सांगितले.
00000

No comments:

Post a Comment