Wednesday, May 20, 2020

सोळाशेहून अधिक नागरिक विशेष रेल्वेने लखनौस रवाना







सोलापूर, दि.20 :- लॉकडाऊनमुळे व जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेशमधील 1632  नागरिक आणि विद्यार्थ्यांना घेऊन विशेष रेल्वे लखनौकडे रवाना झाली. जिल्हा प्रशासन, रेल्वे विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून यासाठीचे उत्तम  नियोजन करण्यात आले होते.
सोलापूर रेल्वे स्थानकावरून आज दुपारी 2:30 वाजता रेल्वे लखनौला रवाना झाली.  अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त बापू बांगर आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकार्यांनी हिरवा झेंडा दाखविला. सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून या नागरिकांची नाव नोंदणी करून घेऊन त्यांना रेल्वेस्थानकावर बोलविण्यात आले होते. सोशल डिस्टन्स ठेवून प्रवासी नागरिकांची आवश्यक कागदपत्रे तपासणी, थर्मल स्क्रीनिंग करून त्यांना रेल्वे डब्यात बसविण्यात आले.
सोलापूर शहर व जिल्ह्यात असणाऱ्या परप्रांतीय नागरिक यांना त्यांच्या राज्यात सोडण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मजूर, नागरिकांनी पायी न जाता तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केले आहे. याआधी रविवारी सोलापूर रेल्वे स्थानकावरून 1146 नागरिकांना घेऊन ग्वाल्हेरकडे रेल्वे रवाना झाली आहे. आता  झारखंड, बिहार आणि राजस्थानला रेल्वेद्वारे सोडण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी परवानगी मिळताच रेल्वे जाईल, अशी माहिती श्री जाधव यांनी दिली.
'प्रिसिजन'कडून पंधराशे भोजन पाकिटचे वाटप
सोलापुरातील प्रिसिजन उद्योग समूहाकडून आज उत्तर प्रदेशाकडे निघालेल्या रेल्वेतील एकूण पंधराशे नागरिकांना भोजन पाकिटचे वाटप करण्यात आले. प्रिसिजन उद्योग समूहाचे प्रमुख श्री. यतीन शहा, डॉ. सुहासिनी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे आदित्य गाडगीळ  यांनी भोजन पाकिटचे वाटप केले.
00000

No comments:

Post a Comment