नागपूर, दि. 15 : गो-विज्ञान अनुसंधान केंद्र चांगले काम करीत आहे. मात्र
वैयक्तिकरित्या काम करताना काही मर्यादा येतात. या केंद्रांनी इतर विभागांसोबत
संपर्क ठेवला तर आणखी चांगले प्रकल्प राबविता येतील. त्याचा फायदा इतरांनासुद्धा
होऊ शकतो. त्यामुळे गो-शाळा केंद्रांनी शासनाच्या इतर विभागांसोबत नेहमी समन्वय
ठेवावा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
रामटेक तालुक्यातील देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्राला आज
राज्यपालांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार मल्लिकार्जून रेड्डी,
राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अनंत रोकडे, गो-विज्ञान
अनुसंधान केंद्रांचे अध्यक्ष हेमंत जांभेकर, उपाध्यक्ष देवेंद्रजी भरतीया, सचिव
सुरेश डवले, केंद्रांचे समन्वयक सुनील मानसिंहका, देवळापारचे सरपंच संजय जयस्वाल
उपस्थित होते.
राज्यपाल सी. विद्यासागर राव पुढे म्हणाले, गो-विज्ञान शाळेतील
नैसर्गिक तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, गोबर गॅस प्रकल्प उत्तम उपक्रम आहेत.
संपूर्ण भारतात या उपक्रमांची माहिती होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारशी तसेच राज्य
शासनाच्या कृषी, आरोग्य आदी विभागांसोबत समन्वय ठेवला तर त्याचा फायदा सामान्य
नागरिकांना होऊ शकतो. गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने येथे जास्तीत जास्त गायींच्या
प्रजाती आणण्यासाठी प्रयत्न करावा. परिसरातील पक्षीजीवन पूर्ववत समृद्ध व्हावे
यासाठीही प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
यावेळी राज्यपालांनी परिसरातील औषध विभाग, गो-शाळा, सेंद्रीय शेती
प्रकल्प, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, औषधी वनस्पती शेती आदींची पाहणी केली.
केंद्राचे अध्यक्ष हेमंत जांभेकर यांनी राज्यपालांना स्मृतीचिन्ह भेट दिले.
कार्यक्रमाला ‘नीरी’चे पूर्व निर्देशक तपन चक्रवर्ती, औषधी विद्या विभागातील नंदिनी
भोजराज यांच्यासह इतर विभागाचे शास्त्रज्ञ, शिक्षक, नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित
होते. तत्पूर्वी देवळापार येथील गुरुकुल आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम,
बँडपथक आणि स्वागत गीताने राज्यपालांचे स्वागत केले.
****
No comments:
Post a Comment