Saturday, September 29, 2018

पंचवार्षिक निवडणुका हा भक्कम लोकशाहीचा पाया – राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया


पुणे, दि. २९ – स्थानिक नेतृत्व बळकट करून सत्तेचे समसमान वाटप करण्यासाठी भारतामध्ये त्रिस्तरीय लोकशाही पद्धत स्वीकारण्यात आली आहे. भारतीय लोकशाही भक्कम करण्याचे कार्य निवडणुकांमुळे होते. पंचवार्षिक निवडणुका हाच भक्कम लोकशाहीचा पाया आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज केले.
राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने आयोजित लोकशाही, निवडणूक व सुशासन या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी,  जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, ॲड. भास्करराव आव्हाड आदी उपस्थित होते.
श्री. सहारिया म्हणाले, १९९२ साली ऐतिहासिक घटनादुरूस्ती करण्यात आली त्यानंतर स्थानिक स्वराज संस्थांना लोकशाहीमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्वच निवडणुका पारदर्शीपणे घेण्याचे प्रयत्न निवडणूक आयोग करत आहे. निवडणूक आयोगासमोर सर्व उमेदवार समान असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी चरित्र पडताळणी, प्रतिज्ञापत्र तसेच निवडणुकांच्या खर्चाचा हिशोब देणे बंधनकारक आहे.
लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे राजकीय पक्षांनी लोकशाहीतील बंधने पाळणे आवश्यक आहे. राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे राजकीय पक्षांनी पालन करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र व राज्य निवडणूक आयोगांना समान अधिकार देण्यात आले आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचीही तरतूद आहे.
घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नोव्हेंबर २०१७ पासून निवडणूक आयोगातर्फे नियमितपणे अशा कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. आजही अनेक जण निवडणूक प्रक्रियेच्या प्रवाहात नाहीत. या सर्वांची मतदार नोंदणी करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. यात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी त्यांनी मतदार नोंदणी केल्याची खात्री करून घ्यावी, अशी सूचना श्री. सहारिया यांनी दिली.  
आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून निघणाऱ्या निष्कर्षांचा लोकशाहीसाठी प्रभावीपणे वापर करण्यात येईल. कार्यशाळेत होणारे विचारमंथन हे चांगल्या समाजासाठी आणि तात्पर्याने चांगल्या व सशक्त लोकशाहीसाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास श्री. सहारिया यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त श्री. म्हैसेकर यांनी केले. कार्यक्रमास पुणे विभागातील वरीष्ठ अधिकारी, प्राध्यापक, विधीज्ञ, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
************







No comments:

Post a Comment