सोलापूर दि. 30 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवा निमित्त केंद्र सरकारने स्टॅंड अप इंडिया योजना सुरूवात केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेऊन उद्योग व्यवसाय विकसित करावेत , असे आवाहन नाबार्डचे जिल्ह्याचे व्यवस्थापक प्रदिप झिले यांनी केले.
श्री. झिले यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ एस.सी , एस.टी प्रवर्गातील महिला असावी किंवा मागासवर्गिय सभासदांचे भांडवल 50 टक्के पेक्षा जास्त असणारी संस्था पात्र ठरू शकते. अर्जदारने प्रथम www.standupmitra.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी करतानाच व्यवसाय , बँकेचे नांव आणि शाखेची निवड करणे अपेक्षित आहे.नोंदणी केल्यानंतर अर्जदाराने संबंधित शाखेच्या अधिका-यांची भेट घेऊन योजना समजून घ्यावी तसेच कागदपत्रांची पुर्तता करावी .
बँकेकडून प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के रक्कम मिळणार आहे. उर्वरित 25 टक्के रक्कम कर्जदाराने उभे करणे अपेक्षित आहे. कर्जासाठीचा व्याजदर कमीत कमी राहील कर्जाची परतफेड सात वर्षात करणे अपेक्षित असून कर्जाचे हप्ते प्रकल्प सुरू झाल्यानंतर किंवा 18 महिन्यानंतर करणे अपेक्षित आहे, अशी माहितीही श्री. झिले यांनी दिली. कर्जदारांनी निवडलेल्या व्यवसायाकरिता प्रशिक्षण आणि इतर माहिती करिता सोलापूर जिल्ह्यातील अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीनिवास पत्की अथवा नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रदीप झिले ( मोबाईल 9423119448) यांच्याशी संपर्क साधावा.
0000000
No comments:
Post a Comment