पुणे, दि. 07- राज्यातील पाणी टंचाई कायमस्वरुपी दूर व्हावी यासाठी राज्य शासनाने जल युक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरु केला आहे. जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचविणारे आणि जलयुक्त शिवार अभियानाची त्या त्या परिसरातील जनजागृती,अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांना, इलेक्टॉनिक्स माध्यमातील प्रतिनिधींना शासनातर्फे पुरस्कार देण्यात येणार आहे.जिल्हा, विभागीय व राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पारितोषिके देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप व अटी पुढीलप्रमाणे आहे.
राज्यस्तर पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार या नावाने देण्यात येणार असून प्रथम पुरस्कार रुपये पन्नास हजार, द्वितीय पुरस्कार रुपये पस्तीस हजार, तृतीय पुरस्कार रुपये पंचवीस हजार देण्यात येणार आहे.
विभागीयस्तर पुरस्कार राजमाता जिजाऊ जलमित्र पुरसकर या नावाने देण्यात येणार असून प्रत्येक विभागामध्ये प्रथम पुरस्कार रुपये तीस हजार, द्वितीय पुरस्कार रुपये वीस हजार आणि तृतीय पुरस्कार रुपये पंधरा हजार देण्यात येणार आहे.
जिल्हा पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावाने देण्यात येणार असून प्रथम पुरस्कार रुपये पंधरा हजार, द्वितीय पुरस्कार रुपये बारा हजार आणि तृतीय पुरस्कार रुपये दहा हजार देण्यात येणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रसिध्दीसाठी बातमीदारांनी मोहिमेच्या अंमलबजावणीच्या प्रथम वर्षी 1 जानेवारी,2015 ते 31 डिसेंबर,2015 आणि त्यापुढे प्रतीवर्षी 1 जानेवारी ते पुढील वर्षातील 31 डिसेंबर या कालावधीत प्रसिध्द केलेले साहित्य पुरस्कारासाठी ग्राहय धरण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या शासनमान्य यादीवरील मराठी,हिंदी,इंग्रजी या भाषेतील दैनिके, साप्ताहिके व पाक्षिकातील लिखाणाचा विचार करण्यात येणार आहे. यासाठी राज्य, विभागीय आणि जिल्हास्तर पुरस्कार समिती स्थापण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या पत्रकारांनी आपले अर्ज तीन प्रतीमध्ये विहीत नमुन्यात जिल्हा समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय,तळमजला,मध्यवर्तीइमारत,पुणे(दूरध्वनी क्र. 26121168/26122302/26121307) येथे 30ऑक्टोबर,
2016 पूर्वी सादर करावे.
सदरील पुरस्काराचा तपशील, स्वरुप व अटी 28 सप्टेंबर,2016 रोजीच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या शासननिर्णयामध्ये नमूद करण्यात आले असूनwww.maharashtra.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावरील “शासन निर्णय” या लिंकवर तो उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment