Thursday, August 18, 2016

“समाजभूषण” पुरस्कारप्राप्त मान्यवरांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा








समाजभूषण पुरस्कारप्राप्त मान्यवरांना
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे, दि. 17: समाजातील विषमतेची विषवल्ली दूर करण्याचे काम करणाऱ्यांना शासनाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंतच्या सर्व समाजभूषण पुरस्कारप्राप्त मान्यवरांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. तसेच या मान्यवरांना सन्मानाने वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाचे आमंत्रणही त्यांनी दिले.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्यावतीने येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात राज्यातील 54 व्यक्तींना 10 संस्थांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेंव्हा मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रीय विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू इदाते, खासदार संजय काकडे, खासदार अमर साबळे, आमदार सर्वश्री ॲड. जयदेव गायकवाड, शरद रणपिसे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, भीमराव तपकीर, आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या संकल्पनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात्मक चौकट दिली असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळेच देशाची प्रगती सुरु असून आजही देश एकसंध राहीला आहे. डॉ. बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने देशभक्त होते. त्यांनी आयुष्यभर समाजातील वंचितांचा विचार केला. प्रत्येक वंचिताला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी संविधानाच्या माध्यमातून केले. लोकशाहीमुळे प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळाले आहे, असेही ते म्हणाले.
समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करणाऱ्यांना शासनाने समाजभूषण पुरस्कार दिला आहे. राज्यात सामाजिक परिवर्तनाचे काम करणाऱ्या प्रत्येकाच्यामागे शासन ठामपणे उभे राहणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणाऱ्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे सर्व समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येणार आहे. या माध्यमातून या मान्यवरांना 1200 व्याधींसाठी राज्यातील 500 प्रतिथयश रुग्णालयात कॅशलेस उपचार मिळतील. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे परिवर्तन होत आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावचे नेतृत्व होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीचा कार्यक्रम दिमाखात करण्यात आला. जगभरातील लोकांनी त्यांना आदरांजली वाहिली. अशा मोठ्या नेत्याचे स्मारक कोणत्याही वादाशिवाय होण्यासाठी शासनाच्यावतीने सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करुन स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत याच वर्षी बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले म्हणाले, विविध योजनांच्या माध्यमातून शासन दलित समाजाचा विकास करत आहे. डॉ. बाबासाहेबांनी घालून दिलेल्या सामाजिक समतेच्या वाटेवर आम्ही चालत आहे. मागासवर्गीय समाजासाठी शासनाकडून देण्यात आलेला सर्व निधी त्याच कामांवर खर्च करण्यावर आम्ही विशेष लक्ष देत असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची सर्व प्रक्रीया ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गिरीश बापट, दिलीप कांबळे, विजय शिवतारे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी केले. तर आभार समाज कल्याण आयुक्त पीयुष सिंह यांनी मानले.
*****
समाजभूषण पुरस्कारप्राप्त मान्यवरांची नावे
मुंबई येथील श्री मधुकर सदाशिव कांबळे, श्री. उमाकांत हरीदास डोईफोडे, श्री. जर्नादन गुणाजी कोंडवीलकर, श्री. काशिनाथ बाबूराव निकाळजे, श्री. अशोक कृष्णकांत प्रभू, श्री. नरहर रामचंद्र चाफेकर, ऑल्गा पास्कल डिमेलो, रघुवीर तुकाराम तुरेकर, रायगड जिल्ह्यातील श्री. रामदार रघुनाथ धोत्रे, रत्नागिरी जिल्ह्यातील श्री. शिलभद्र रामकृष्ण जाधव, नाशिक जिल्ह्यातील श्री. अशोक गोविंदराव करंजकर, धुळे जिल्ह्यातील श्री. सरेश अंबरनाथ लोंढे, श्रीमती रजीया सुलताना शफीयुद्दीन सय्यद, नगर जिल्ह्यातील श्री. दीपक गणपतराव साळुंखे, श्री. कन्हैय्या गामाजी गिलशेर, नंदुरबार जिल्ह्यातील श्री. रोहीतदास शंकर राठोड, पुणे जिल्ह्यातील श्री. सावळाराम दादू वानखेडे, श्री. अशोकलाल रतनलाल शहा, श्री. अजय उर्फ अदिनाथ रंभाजी चांदणे, श्री. अप्पा रामचंद्र मोहिते, देवीचंद केसरीमल जैन, सांगली जिल्ह्यातील श्री. भिमराव महादेव देसाई, श्री. मिलींद लक्ष्मण माने, सातारा जिल्ह्यातील श्री. शिवाजी महादेव जाधव, सोलापूर जिल्ह्यातील श्री. शिवाजीराव नारायणराव पवार, श्री. सुबोध खांडेराव वाघमोडे, श्री. प्रभाकर तुकाराम कसबे (गुरुजी), अमरावती जिल्ह्यातील मुरलीधर लक्ष्मणराव पिसे, बुलढाणा जिल्ह्यातील श्री. शिवाजीराव नवघरे, श्री. नानासाहेब शंकरराव कांडलकर, अकोला जिल्ह्यातील श्री. भिमराव शंकरराव इंगळे, यवतमाळ जिल्ह्यातील श्री. प्रल्हाद भिमराव सिडाम, नागपूर जिल्ह्यातील डॉ. रमेश परमानंद जनबंधू, श्री. आनंदराव नारायणराव हवरे, श्री. बाबुराव सर्जू वामन, श्री. दिलीप रामकृष्ण धोटे, श्री. शंकर रजन्याजी वानखेडे, श्री. शंकर नथूजी ढेंगरे, श्री. राधेश्यामस्वामी पुनाजी शिवले, सौ. रत्नमाला इदल मेश्राम, श्री. चिमणलाल बबुजी हाडोती, श्री. मनोहर रामप्रसाद अरखेल, श्री. इश्वरसिंग रामू नहार, भंडारा जिल्ह्यातील श्री. यशवंत महादेव उपरीकर, सौ. पुष्पकला संजू मेश्राम, गोंदीया जिल्ह्यातील श्री. काशीफ जमा अब्दुल गफुर कुरेशी, श्री. गोविंद कोदूजी मेश्राम, श्री. कुसन धुसाजी धासले, औरंगाबाद जिल्ह्यातील श्री. खंडोजी शामराव गायकवाड, श्री. रविंद्राप्पा काशिनाथ अप्पा साखरे, लातूर जिल्ह्यातील डॉ. संजय देवीदास जमदाडे, गडचिरोली जिल्ह्यातील श्री. फुलचंद बुधाजी रामटेके, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री. भास्कर हिंदूराव खांडेकर, जालना जिल्ह्यातील श्री. भाऊराव मल्हारी साळवे.
पुरस्कार प्राप्त संस्थांची नावे
पुणे जिल्ह्यातील स्वरुप वर्धीनी संस्था, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, नागपूर जिल्ह्यातील श्री. मगल बहुदेशीय, शिक्षण तांत्रिक शिक्षण प्रशिक्षण संस्था, लोककौल मल्टीपर्पज ॲण्ड चॅरिटेबल सोसायटी. रत्नागिरी जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळे , सोलापूर जिल्ह्यातील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठाण, हिंगोली जिल्हयातील जय विठ्ठल रुक्माई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुंबई येथील भवतू सब्ब मंगलम संस्था, चंद्रपूर जिल्ह्यातील बंगाली समाज एकता बहुउदेशीय संस्था, गोंदिया जिल्ह्यातील प्रबोधन एज्युकेशन सोसायटी.



No comments:

Post a Comment