“आयुष इन पब्लीक हेल्थ” राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन
आरोग्य उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या
जाहिरातींवर कारवाई करावी
…. राज्यपाल सी.विद्यासागर राव
पुणे, दि. 13 – भारतामध्ये प्राचीन काळापासून आयुर्वेद,
योगा, निसार्गोपचार, युनानी,
सिध्द आणि होमीओपॅथी या उपचार पध्दती अस्तित्वात आहेत. या प्राचीन भारतीय उपचार पध्दतींचा अधिकाधीक प्रसार व प्रचार व्हावा यासाठी
केंद्र सरकाराने आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. तथापि,
आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या आणि दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांच्या जाहिरातीवर
शासनाने कडक कारवाई करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आरोग्य विज्ञान विभाग, राष्ट्रीय निसार्गोपचार संस्थान, केंद्र सरकारचे आयुष
मंत्रालय आणि महाराष्ट्र असोसीएशन ऑफ ॲथ्रोपोलॉजीकल सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने
“आयुष इन पब्लीक हेल्थ” या चर्चासत्राचे आयोजन सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठाच्या नामदेव सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन करताना राज्यपाल सी.विद्यासागर
राव बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.वासुदेव गाडे, बंगळूरुच्या ट्रॉन्स डिसीप्लीनरी विद्यापीठाचे
कुलगुरु प्रा.दर्शन शंकर, माजी आरोग्य विज्ञान
विभाग प्रमुख व सेंटर फॉर आयुष इन पब्लीक हेल्थचे मानद संचालक प्रा.आर.के.मुटाटकर, राष्ट्रीय निसार्गोपचार संस्थेच्या संचालक डॉ.के.सत्यलक्ष्मी, सेवानिवृत्त सचिव श्रीमती शैलजा चंद्रा,
विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ.व्ही.बी.गायकवाड, आरोग्य् विज्ञान विद्यापीठाच्या
संचालक डॉ.अनिला कार उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल म्हणाले की, प्राचीन काळापासून आयुर्वेद,
योगा, युनानी, सिध्द,
निसर्गोपचार आणि होमीओपॅथी भारतीय आरोग्य उपचार सेवेचा अविभाज्य भाग
आहे. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने पुण्यामध्ये राष्ट्रीय
निसर्गोपचार संस्थेची स्थापना झाली. पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांनी
योग व पंचकर्म पध्दतीला जागतिक स्तरावर महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भविष्यात आरोग्य उपचारासाठी भारत महत्वाचे जागतिक केंद्र बनणार आहे.
जीवनपध्दती बदलल्यामुळे होणाऱ्या व्याधींमुळे विशेषकरुन मधुमेहामुळे
सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक आरोग्य
सुधारण्यासाठी व्याधीच होऊ नये यासाठी आयुषचा वापर करावा, असे
सांगून आयुषच्या प्रभावी वापरामुळे या धोक्यांवर मात करता येईल असे राज्यपाल म्हणाले.
महिलांमधील व्याधी व दोष दूर करण्यासाठीही आधुनिक औषधोपचाराबरोबरच आयुषला प्राधान्य
देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
माता व नवजातशिशू व प्रसूतीपूर्व उपचारांमध्ये आयुष वापर करण्यात
यावा. महाराष्ट्रात विशेषकरुन गडचिरोली आणि सिंधुदूर्ग जिल्हयात
मोठया प्रमाणावर औषधी वनस्पती आढळून येतात. तरुण व तरुणींनी या
नैसर्गिक ठेव्याचा वापर त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी करण्याचे आवाहन राज्यपालांनी
केले. कौशल्य विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून याकडे लक्ष दिल्यास त्यातून रोजगार
निर्मितीही होईल असेही राज्यपाल म्हणाले.
पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “स्वयम” उपग्रहाची निर्मिती केली. या प्रकल्पाचे प्रमुख व सहभागी
विद्यार्थ्यांचा यावेळी राज्यपालांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा.आर.के.मुटाटकर लिखीत “आयुष इन पब्लीक हेल्थ” या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी राज्यपाल सी.विद्यागर राव
यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी कुलगुरु डॉ.वासुदेव गाडे, प्रा.आर.के.मुटाटकर, प्रा.दर्शन शंकर यांनीही
चर्चासत्रावर आपले विचार मांडले.
या चर्चासत्रास विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी
मोठया संख्येने उपस्थित होत्या.
*****
No comments:
Post a Comment