पुणे दि. 11 : वन्यजीवांची हत्या
आणि तस्करी करणाऱ्या विरोधात
ठोस कारवाई करण्याची आवश्यकता
असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर
राव यांनी केले.
येथील यशदाच्या
सभागृहात वन विभागाच्या उत्कृष्ट
काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बक्षीस वितरण समारंभात मार्गदर्शन
करतांना ते बोलत होते. यावेळी जलसंधारण राज्यमंत्री
विजय शिवतारे, वित्त नियोजन
व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. श्रीमती मेधा कुलकर्णी, आ. जगदीश
मुळीक, वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान
वनसंरक्षक सर्जन भगत, आदि उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल
म्हणाले की, वाघ, अन्य वन्यजीवांना
सापळा लावून पकडण्यात येते. तसेच वीजेचा धक्का
देण्याचेही प्रकार घडतात. याचे मला अतिशय
वाईट वाटते. याबाबत कायद्यानुसार ठोस
कारवाई करावी तसेच संबंधितांना
कडक शिक्षा झाली पाहिजे
यादृष्टीने उपाययोजना
कराव्यात, असे आवाहन केले.
वन्यजीवांची हत्या आणि तस्कारी
रोखण्यासाठी आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर केला जात
आहे. वन व्यवस्थापन व वन्य
जीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी
वन विभागांकडून केले
जाणारे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव
यांनी केले.
राज्यात 1 जुलै, 2016 रोजी वन विभागाच्या वतीने एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष
लागवडीचा उपक्रम अतिशय यशस्वीपणे
राबविण्यात आला. एकाच दिवशी 2.82 कोटी वृक्ष
लगावडीचे उद्दिष्ट साध्य करण्यात
आले. वृक्ष लागवडीच्या चळवळीची
गती कायम ठेवावी. पुढील वर्षी 3 कोटी, 2018 मध्ये 10 कोटी, 2019 मध्ये 25 कोटी वृक्ष
लागवडीचे उद्दिष्ट्य झाले पाहिजे
असे प्रतिपादनही त्यांनी
यावेळी केले.
राज्याच्या काही
भागांत वन्य प्राणी आणि
मानव यांच्यातील संघर्ष तीव्र
असल्याचे दिसते. या संघर्षाकडे कायद्याची
अंमलबजावणी करण्याबरोबरच सौहार्दपूर्ण
भावनेने पाहून त्यांची मानसिकता
व दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रयत्न
करावेत. हा संघर्ष
हाताळण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी
व कर्मचारी यांना सुध्दा सुरक्षा
दिली जाईलच. त्याचबरोबर कार्यक्षमता वाढविण्यासाठी
उपाय योजना केल्या जातील, असे
प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव
यांनी केले.
यावेळी वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की वन व वन्य जीव संरक्षण, संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चांगल्या कामाबद्दल पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्काराला साजेसे काम भविष्यात निरंतर करावे. राज्यात एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी केला. यापुढे 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. वृक्ष लागवडीचे ईश्वरीय कार्य करावे लागणार आहे. यासाठी भौतिक साधने देवू. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी वाहने, निवास व्यवस्था, प्रशिक्षण दिले जाणार आहे. सामान्य जनतेला वन विभाग वरदान वाटेल असे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
स्वागतपर भाषणात वनविभागाचे सचिव विकास खारगे म्हणाले की, 28 हजाराहून अधिक कर्मचारी वन्य जीव सरंक्षणाचे काम करीत आहेत. वन विभागासमोर विविध आव्हाने आहेत. ती पेलण्यासाठी 20 हून अधिक योजना सुरु केल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर, समाजातील सर्व घटकांना घेवून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी उपाय करण्यात येत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी राज्यपाल सी.
विद्यासागर राव यांच्या हस्ते वनविभागात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले तसेच 'पश्चिम घाटातील मस्यसंपदा' पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
***
No comments:
Post a Comment