Monday, August 8, 2016

विभागातील ८०० गावांतील कामे शंभर टक्के पूर्ण - विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्

पुणे विभागात जलयुक्तची ६७५ कोटींची कामे







पुणे, दि. 8 (विमाका): पुणे विभागात २०१५-१६ मध्ये राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ९०५ गावांची निवड करण्यात आली होती. आजपर्यंत त्यातील ८०० गावांतील म्हणजेच ८८ टक्के गावांतील कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित १०६ गावांतील कामे प्रगतीपथावर आहेत. विभागात ६७५ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. तर ४७५ कि.मी. च्या  नाल्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानात राज्यात पुणे विभाग आघाडीवर आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्  यांनी आज येथे दिली.
पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील २०० गावांची निवड या अभियानासाठी करण्यात आली होती. त्यापैकी १८७ गावांमध्ये जलयुक्तचे प्रकल्प आराखड्यानुसार १०० टक्के कामे पूर्ण झाले आहेत. ८० टक्के कामे पूर्ण झालेली गावे आठ असून पाच गावांमध्ये ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. सातारा जिल्ह्यातील २१५ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड झाली होती. त्यापैकी १८३ गावांमध्ये प्रकल्प आराखड्यानुसार १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. २३ गावांमध्ये ८० टक्के कामे पूर्ण झाली असून, नऊ गावांमधील कामे ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात कामे झाली आहेत. सांगली जिल्ह्यातील १४१ गावांचे जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड झाली होती. त्यापैकी ११० गावांतील प्रकल्प आराखड्यानुसार १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ३१ गावांमधील ८० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण झाली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील २८० गावांची जलयुक्त अभियानासाठी निवड झाली होती. त्यापैकी २५२ गावांतील कामे प्रकल्प आराखड्यानुसार १०० टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित १२ गावांमधील ८० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण झाली असून १६ गावांमधील ५० टक्क्यांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ६९ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड झाली होती. त्यापैकी ६७ गावांमधील कामे प्रकल्प आराखड्यानुसार १०० टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित दोन गावांमधील कामे ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात पूर्ण झाली आहेत. या अभियानात एकूण सुमारे ४९ हजार कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहितीही श्री. चोक्कलिंगम् यांनी यावेळी दिली.
या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील २०० गावांमधील ६ हजार ४०२ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर १६५ कोटी ८२ लाख ३४ हजार रुपये खर्च झाला आहे. सातारा जिल्ह्यातील ११५ गावांतील ७ हजार ९३४ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर १३८ कोटी ५८ लाख ९० हजार रुपये खर्च झाला आहे. सांगली जिल्ह्यातील १४१ गावांमध्ये ४ हजार ११२ कामे पूर्ण झाली असून त्यावर ६६ कोटी ९३ लाख रुपये खर्च झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील २८० गावांमधील ३० हजार ३५ कामे पूर्ण झाली असून त्यावर २७७ कोटी ५३ लाख ८९ हजार रुपये खर्च झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ६९ गावांमधील ९६७ कामांवर २६ कोटी ४८ लाख ९८ हजार रुपये खर्च झाला आहे, असे सांगून श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, पुणे विभागातील कामे पूर्ण झालेल्या एकूण गावांची संख्या ९०५ असून एकूण पूर्ण झालेल्या कामांची संख्या ४९ हजार ४५० आहे. तर या कामांवर ६७५ कोटी ३७ लाख ११ हजार रुपये खर्च झाले आहे. या विभागातील शंभर टक्के कामे पूर्ण झालेल्या गावांची संख्या ७९९ आहे. तर ८० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण झालेल्या गावांची संख्या ७६ आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण झालेल्या गावांची संख्या ३० आहे. या अभियानात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर ओढ्यातील, तलावातील आणि बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे, खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याची कामे झाली आहेत. सुमारे १३१ लाख घनमीटर या अभियानात या कालावधीत गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे ४७५ कि.मी. लांबीचे नाला रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम झाले आहे. या अभियानात सुमारे १६३ कोटींची कामे लोकसहभागातून झाली आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
****



No comments:

Post a Comment